मराठी मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेता शशांक केतकर नेहमीच चर्चेत असतो. ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील ‘श्री’ या भूमिकेमुळे शशांक घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक मालिकांमध्ये काम केलं असून त्याच्या विविधांगी भूमिकांमुळे तो प्रेक्षकांचा लाडका बनला. सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुरंबा’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे. केवळ मराठीमध्ये नाही, तर हिंदी कलाकृतींमधूनही त्याने स्वतःची अशी छाप पाडली. (Shashank Ketkar Post)
सोशल मीडियावरही शशांकचा बर्यापैकी वावर असलेला पाहायला मिळतो. बरेचदा शशांक सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा आपली स्पष्ट मतं मांडत असतो. त्याने नुकताच त्याच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. गोव्यातील समुद्रकिनाऱ्याचा व्हिडीओ शेअर करत त्याने ही पोस्ट शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये गोव्याच्या कलंगुट समुद्र किनाऱ्यावर ३१ डिसेंबरच्या रात्री पर्यटकांची तुफान गर्दी असल्याचं पाहायला मिळत आहे.
शशांकने हा गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावरील व्हायरल व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे की, “या रात्री समुद्राच्या पाण्यात अमृत मिळत असेल का? ३१ डिसेंबरला असं काय खास असतं?” असं म्हणत स्टोरी पोस्ट केली आहे. अभिनेत्याने शेअर केलेल्या या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी सुद्धा आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या पाहायला मिळत आहेत. “या व्हिडीओमध्ये मला बीच दिसत नाही आहे, तुम्ही खोटं बोलत आहात” अशी गमतीशीर कमेंट केली आहे. “या गर्दीत फिरण्यापेक्षा घरी बसलेलं बरं आहे”, “समुद्रकिनारा कुठे आहे?”, “जत्रा” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केलेल्या पाहायला मिळत आहेत.
यापूर्वी देखील शशांकने अशाप्रकारचे व्हायरल व्हिडीओ शेअर करत आपलं मत मांडलेलं पाहायला मिळालं. अनेक सामाजिक विषयांवर सडेतोड भाष्य करत त्याने आपली मतं मांडली आहेत. शिवाय ट्रोल करणाऱ्या युजर्सनाही त्याने वेळोवेळी प्रतिउत्तर देत धडा शिकवला आहे.