‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची चर्चा इतकी व्हायरल झाली आहे की, आज या चित्रपटाने मोठमोठ्या चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस गल्ल्याला मागे सोडलं आहे. घवघवीत यश मिळालेल्या या चित्रपटाची चलती जगभरात सुरु आहे. बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवलेल्या या चित्रपटाची नुकतीच सक्सेस पार्टी झाली. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी-मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत. या कलाकारांसोबत याशिवाय असणाऱ्या चित्रपटातील इतर सर्व कलाकारांच्या उपस्थितीत ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची सक्सेस पार्टी दणक्यात साजरी झाली. (Sharad Ponkshe Character)
दरम्यान चित्रपटातील एक मुख्य भूमिका अभिनेते शरद पोंक्षे यांनी देखील साकारली होती. या चित्रपटात अभिनेते शरद पोंक्षेंनी सुकन्या मोनेंच्या सासऱ्याची भूमिका साकारली आहे. नुकतंच त्यांनी या चित्रपटाबद्दल एक किस्सा सांगितला आहे. “जेव्हा ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तो हिट ठरला, त्यावेळी मी इंग्लंडमध्ये होतो. मी तिथून आल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी तिकीट काढलं आणि चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहिला. माझा मुलाने मला म्हटलं, ‘बाबा मास्क लावून चलं.’ त्यावेळी मी त्याला म्हणालो, ‘अजिबात गरज नाही. हा चित्रपट पाहिल्यानतंर मला तिथे पाहिल्यावर कोणीही ओळखणार नाही.’

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ना काही तरी उतार चढाव येतात. माझ्या आयुष्यात २०१९ हे वर्ष हे कठीण होतं. मला तेव्हा कर्करोगाने ग्रासलं होतं. त्या काळात मला मराठी सिनेसृष्टीतील काहींनी फोन केला. यातील एक म्हणजे केदार शिदे आणि दुसरा म्हणजे महेश मांजरेकर. मी आजारपणात होतो आणि केदार म्हणाला, “लवकर बरा हो, तुझ्यासाठी एक भूमिका ठेवली आहे”, जेव्हा तुम्हाला एखादा दिग्दर्शक असं म्हणतो, तेव्हा हा विश्वास फार महत्त्वाचा असतो”, असे शरद पोंक्षे म्हणाले.(Sharad Ponkshe Kedar Shinde)
“मी आजारपणातून बरा होऊन एक महिनाही झाला नव्हता आणि तेव्हा मी तो चित्रपट शूट केला. त्यामुळे त्या चित्रपटात मी असा दिसतोय. मी त्या अण्णांच्या भूमिकेसाठी वर्षभर मेहनत केली, असंच लोकांना वाटतंय. पण तसं काहीही नाही.”
“बाईपण भारी देवा या चित्रपटासाठी महिलांनी तुडूंब गर्दी केली. एकीकडे आपण मराठी चित्रपटासाठी प्रेक्षक येत नाही, असं म्हणतो. तर दुसरीकडे या चित्रपटामुळे अनेक महिला ज्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात कधीच चित्रपटगृह पाहिलं नव्हतं, त्यांनी तिकीट काढून चित्रपट पाहिला. हीच ताकद या चित्रपटात आहे, असं मला वाटतं. केदारने या चित्रपटात महिल्यांच्या अनेक लहान लहान भावना टिपल्या आहेत. यामुळे पुरुषांनाही चित्रपट बघताना रडावसं वाटतं”, असेही शरद पोंक्षेंनी सांगितले.
