मराठी नाटक, मालिका व चित्रपट अशा तिन्ही माध्यमांत काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. संकर्षण हा एक उत्तम लेखक, कवी व संवादकार असल्यामुळे त्याचे लिखाण व बोलणं ऐकणे हेदेखील त्याच्या चाहत्यांना भलतेच आवडत असते. त्याचबरोबर तो निवेदकाची भूमिकाही अगदी दमदार पद्धतीने वठवतो. आजवर त्याने अनेक लोकप्रिय कार्यक्रमांचे सूत्रसंचालन व निवेदन केले आहे.
अशातच संकर्षण झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमाचेदेखील निवेदन करणार आहे. याचनिमित्ताने संकर्षणने ‘इट्स मज्जा’बरोबर खास संवाद साधला. यावेळी त्याला त्याच्या या कार्यक्रमाच्या निवेदनाच्या भूमिकेबद्दल विचारण्यात आले. याचे उत्तर देत संकर्षणने असं म्हटलं की, “मी या कार्यक्रमाचा पूर्ण वेळ निवेदक नाही. माझा मित्र डॉ. निलेश साबळे याची ही जागा आहे. तेच या कार्यक्रमाचे सूत्रधार, लेखक, दिग्दर्शक आहे. त्यामुळे निलेश साबळेची जागा आमच्यापैकी कुणीही घेऊ शकत नाही”.
यापुढे संकर्षणने असं म्हटलं की, “चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम आता काही वेळासाठी निरोप घेत आहे. त्यामुळे या निरोप समारंभासाठी पाहून निवेदक म्हणून मी निवेदन करणार आहे. मी या कार्यक्रमाचा पूर्णवेळ निवेदक नाही आणि माझी तशी इच्छाही नाही. याचं कारण असं की ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम म्हटलं की, निलेश साबळे हेच नाव येतं. कारण या शोमध्ये त्याची एक वेगळी जागा आहे आणि ती त्याने निर्माण केली आहे. त्यामुळे मी पाहुणा निवेदकाची भूमिका साकारणार आहे”.
दरम्यान, संकर्षणचे रंगभूमीवर सध्या ‘नियम अटी लागू’, ‘तू म्हणशील तसं’ या नाटकांसह त्याचा ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा कवितांचा कार्यक्रमही सुरू आहे. त्याचबरोबर तो काही कार्यक्रमांचे निवेदनही करत आहे. त्यामुळे त्याचे अनेक चाहते मंडळी त्याच्या अभिनयासह सूत्रसंचालनाचे देखील कौतुक करत असतात.