अभिनेता प्रसाद जवादे व अभिनेत्री अमृता देशमुख ही जोडी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. ‘बिग बॉस’ मराठीमुळे ही जोडी चर्चेत आली. ‘बिग बॉस’मध्ये असताना दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यांनतर या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. प्रसाद व अमृता यांनी थेट त्यांच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. त्यानंतर अगदी शाही थाटामाटात या जोडीचा विवाहसोहळा संपन्न झाला. अमृता व प्रसादच्या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. (Prasad Jawade On Her Mother In Law)
अमृता-प्रसादच्या लग्नाला त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी, कुटुंबीयांनी व कलाकार मित्रांनी धमाल-मस्ती केलेली पहायला मिळाली. लग्नानंतर लगेचच ही जोडी त्यांच्या सुखी संसारात रमलेली दिसली. शिवाय दोघांनीही त्यांच्या कामालाही सुरुवात केली आहे. अमृता सध्या नाटकविश्वात रमलेली दिसत आहे तर प्रसाद त्यांच्या नव्या ‘पारू’ या मालिकेच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. अशातच ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर प्रसाद जवादेने हजेरी लावली होती. यावेळी त्याने ‘इट्स मज्जा’सह अनेक गप्पा मारल्या.
प्रसादने त्याच्या व सासूबाईंच्या नात्याबद्दल भाष्य केलं. प्रसाद म्हणाला, “सासूबाईंचं नाव घेतलं की मला घाम फुटतो. माझ्या सासूबाई खूप गोड आहेत. खरं सांगायचं तर मला अजून एक आई भेटली असं मला वाटतं. त्या मला खूप सांभाळून घेतात, नवनवीन गोष्टीही त्या सांगत असतात. बरेचदा कामानिमित्त मला अमृताला सांभाळता येत नाही तेव्हा त्या तिच्याबरोबर असतात. अजूनतरी मी सासुरवास भोगला नाही आणि मला भोगावा लागेल असंही वाटत नाही. कारण सगळेच या क्षेत्राशी निगडित आहेत, त्यामुळे या क्षेत्रातील असल्यामुळे सगळेचजण वेळ-काळ समजून घेतात”.
एकूणच प्रसादच्या या म्हणण्यावरुन त्याच व त्याच्या सासूमध्ये खास बॉण्डिंग असल्याचं समजत आहे. शिवाय अमृताबद्दल बोलतानाही प्रसादने यावेळी भाष्य केलं. शुटिंगनिमित्त साताऱ्यात असल्याने तो घराला, बायकोला मिस करत असल्याचंही त्याने यावेळी बोलताना सांगितलं.