उत्तम अभिनेता, कवी, लेखक, सूत्रसंचालक अशा विविधांगी भूमिका साकारत अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने चाहत्यांच्या मनात आपली जागा निर्माण केली. सध्या संकर्षण नाटकविश्वातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. संकर्षण हा सध्या त्याच्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या प्रोयोगादरम्यान व्यस्त असल्याचं पाहायला मिळत आहे. नियम व अटी लागू हे नाटक रंगभूमीवर विशेष गाजत आहे. या नाटकात संकर्षण व अमृता देशमुख ही जोडी मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. (Sankarshan Karhade Emotional Post)
केवळ महाराष्ट्रातच नव्हेतर परदेशातही या नाटकाचे चाहते आहेत. म्हणूनच या नाटकाच्या परदेश दौऱ्यानिमित्त संपूर्ण टीम लंडनला जायला निघाली. एअरपोर्टवरील खास फोटो शेअर करत संकर्षणने एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. संकर्षणच त्याच्या दोन्ही मुलांवर विशेष प्रेम आहे. सर्वज्ञ व स्रग्वी नावाची संकर्षणाला दोन जुळी मुलं आहेत. नेहमीच तो त्यांच्याबाबतच्या खास पोस्ट सोशल मीडियावरुन चाहत्यांसह शेअर करत असतो. आता मुलांना सोडून नाटकाच्या प्रयोगानिमित्त जात असताना संकर्षण भावुक झालेला पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियावरुन एक खास पोस्ट शेअर करत त्याने लिहिलं आहे की, “‘नियम व अटी लागू’च्या प्रयोगांसाठी लंडनला निघालो आहे. प्रवासाला निघताना मुलांच्या आठवणीत काही सुचलं. मी लहान असताना माझे बाबा बदलीच्या गावी जायचे, आठवडाभर तिकडेच, शनिवार, रविवार यायचे, शनिवारी मी रात्री त्यांची खूप वाट पहायचो, सोमवार पहाटे ते निघणार म्हणून मी रविवारपासून रडायचो. मी जरी बाबा झालो असलो तरी भावनेत धडपड करतोच आहे, आता मुलांना सोडून जातांना मी तसाच रडतो आहे. आता जे माझं होतंय, तेच बाबांचं व्हायचं का?, त्यांनाही माझ्यासारखंच लपूनछपून रडू यायचं का?”, असं त्याने म्हटलं आहे.
यापुढे त्याने लिहिलं आहे की, “बाळ बाबाचा बाबा बाळाचा, सहवास सतत मागतं, पण काय करणार कामासाठी लांब जावं लागतं. ऐकेल तो माझं नक्की जर पहात असेल देव, माझ्या बाळांना आणि माझ्या बाबांना आयुष्यभर सुखात ठेव” , अशी प्रार्थनाही त्याने देवाकडे केली आहे.