‘बिग बॉस १७’ हा शो आता संपला असला तरीदेखील या शोविषयी व शोमधील कलाकारांविषयी अजूनही चर्चा रंगताना पाहायला मिळत आहेत. ‘बिग बॉस १७’च्या घरातील अनेक लोकप्रिय जोड्यांपैकी एक कलाकार जोडी म्हणजे अभिनेत्री अंकिता लोखंडे व तिचा पती विकी जैन. बिग बॉसच्या घरात अंकीटा विकी यांच्यात अनेकदा वाद, भांडणं व मारामारी झाल्याचे पाहायला मिळाले.
‘बिग बॉस’च्या घरातील अंकिता व विकी यांच्या भांडणामुळे या घराबाहेर पडताच त्यांचे नाते टिकेल की नाही असा प्रश्न अनेकांना पडला होता. अंकिता-विकी यांच्या भांडणामुळे त्यांचे नाते अनेकदा तुटण्याच्या मार्गावर आले होते. अशातच अंकिताने सलमान खाननेही तिला लग्न वाचवण्यासाठी एक खास सल्ला दिला असल्याचा खुलासा केला आहे. अंकिताने नुकतीच भारती सिंग व हर्ष लिंबाचिया यांना खास मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने याबद्दलचा खुलासा केला आहे.
यावेळी ती असं म्हणाली की, “सलमान सरांनी मला बिग बॉस संपताच त्यांना भेटायला गेली असताना एक सल्ला दिला होता. तेव्हा ते मला असं म्हणाले होते की, मी तुम्हाला एक सांगतो की आता तुम्ही बाळाला जन्म द्या. यावर मी त्यांना “सर, काय म्हणत आहात?” असं म्हटलं. सलमानचे हे बोलणे ऐकून मी थोडी अस्वस्थ झाली होती. यापुढे अंकिता असं म्हणाली, “त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा होता की मूल झाल्यानंतर एखादे जोडपे आणखी जवळ येतात”.
या मुलाखतीत विकी जैननेही सहभाग घेतला होता. यावेळी तो असं म्हणाला की, “कोणतेही लग्न केवळ मुलांमुळेच दीर्घकाळ टिकते.” दरम्यान, अंकिता-विकी यांना ‘बिग बॉस’ शोमुळे चांगलीच लोकप्रियता व प्रसिद्धी मिळाली आहे. या शोमुळे त्यांना आता आणखी नवीन शोदेखील मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता त्या दोघांना पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी त्यांचे अनेक चाहतेमंडळी उत्सुक आहेत.