“ए परश्या आर्ची आली रे आर्ची…” हा लोकप्रिय डायलॉग सर्वांना ठाऊकच असेल आणि हा डायलॉग म्हणणारा अभिनेता तानाजी गालगुंडेही सर्वांच्याच ओळखीचाच आहे. त्याचबरोबर ज्या चित्रपटातील हा डायलॉग आहे तो चित्रपट म्हणजे ‘सैराट’ ही सर्वांचा आवडताच चित्रपट आहे. या चित्रपटातील आर्ची-परशा यांच्यासह सल्या-बाळ्या व इतर काही कलाकारदेखील चांगलेच लोकप्रिय झाले. या चित्रपटात ‘लंगड्या’ म्हणून नावारुपाला आलेला अभिनेता म्हणजे तानाजी गालगुंडे. ‘सैराट’मुळे तानाजीच्या आयुष्याला चांगलीच कलाटणी मिळाली. ‘सैराट’नंतर तानाजीने अनेक चित्रपटांत छोट्यामोठ्या भूमिका साकारल्या.
‘सैराट’ हा गावच्या जातीव्यवस्थेवर व जातीव्यवस्थेमधील लग्नसंस्थावर भाष्य करणारा चित्रपट होता. या चित्रपटातून गावच्या जातीव्यवस्थेबद्दल, जातीव्यवस्थेमुळे होणाऱ्या श्रीमंत-गरीब या स्तरावर व या जातीव्यवस्थेचा लग्नसंस्थेवर काय परिणाम होतो? त्याचे कसे व किती पडसाद उमटले जातात, यावर भाष्य करण्यात आले होते आणि या चित्रपटात तानाजीची महत्त्वपूर्ण भूमिका होती. या चित्रपटामुळे तानाजीच्या आयुष्यात काय फरक पडला आणि त्याचे या जातीबद्दल काय मत आहे? याबद्दल त्याने नुकतेच एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे.
तानाजीने नुकतीच ‘आरपार’ या युट्यूब वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने जातीव्यवस्थेवर भाष्य करताना स्वतः चा एक किस्सा सांगितला आहे. याबद्दल बोलताना त्याने असं म्हटलं की, “मी माझंच एक उदाहरण देतो की, माझी गर्लफ्रेंड ही वेगळ्या जातीची आहे आणि मी वेगळ्या जातीचा आहे. मी जातव्यवस्था मानत नाही, मी त्या पलीकडे गेलो आहे. पाच-सहा वर्षे मी याबद्दल घरी काही बोललोच नाही. कारण त्यांची विचारधारा तशी नव्हती आणि त्यांना हे पटणारही नव्हतं. पण माझ्या गर्लफ्रेंडने आपण दोघे रिलेशनमध्ये आहोत आणि आपण दोघे यापुढे एकत्र राहणार आहोत हे मी माझ्या घरच्यांना सांगावं असा तगादा लावला. यावर मी तिला त्यांना हे सगळं काही पटणार नाही, आपण आपलं एकत्र राहू. पुढे बघू कधी सांगायचं तेव्हा सांगू असं म्हटलं. पण तिने खूपच आग्रह केला आणि मग एके दिवशी त्यांना हे सगळं सांगायचं असं ठरलं. पण मी काही बोलणार नाही तुझं तूच काय ते बोल असं तिला म्हटलं”.
यापुढे त्याने असं म्हटलं की, “माझ्या पायाचे ऑपरेशन झाले होते तेव्हा माझी आई पुण्यात आली होती. तेव्हा गर्लफ्रेंडही माझी काळजी घ्यायला यायची आणि माझ्या गर्लफ्रेंडची आई ही माझ्या आईच्याच गावची आहे. त्यामुळे तिला तिच्याबद्दल माहीत होतंच. आमच्याबद्दल काही माहिती नसताना माझ्या आईचं आणि गर्लफ्रेंडचं खूप चांगलं चाललं होतं. मग माझ्या गर्लफ्रेंडने आईला आमच्याबद्दल सांगितलं. त्यानंतर मी गर्लफ्रेंडला याबद्दल विचारलं, त्यावर आई नको बोलली असं तिने मला सांगितलं. ती गेल्यानंतर मग माझ्या आईने माझ्यावर राग काढायला सुरुवात केली. ‘तुला याचसाठी आम्ही इकडे पाठवलं आहे का? म्हणून आम्ही तुला इथे पाठवत नव्हतो’ असं काय-काय बोलायला लागली”.
यापुढे तानाजी असं म्हणाला की, “यानंतर तिने मला त्या मुलीबरोबर राहू नको असं सांगितलं. यावर मी तिला “का राहू नको” असं विचारलं. यावर आई “दुसरी कोणतीही मुलगी चालेल पण ती नको” असं म्हणाली. कारण सर्व गावाला त्या मुलीची ओळख होती आणि ती कोणत्या जातीची आहे हेही माहीत होतं. त्यामुळे “तू दुसऱ्या जातीची मुलगी आण, आमचा जातीला विरोध नाही, पण ती मुलगी नको” असं म्हटली”.