आयपीएल २०२४ मध्ये एकेकाळचा धडाकेबाज संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई इंडियन्सचा हा हंगाम हवा त्या धडाक्यात सुरु होताना दिसत नाहीये. पहिल्या तीन सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला. गुजरात, हैद्राबाद आणि आता राजस्थान या संघाकडून देखील मुंबईला मात देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई संघ चिंतेत दिसत आहे. मुंबई इंडियन्सप्रमाणे या संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या देखील अडचणींमध्ये वाढ होताना दिसते. रोहित शर्माला मुंबईच्या कर्णधार पदावरून हटवल्यापासून चाहत्यांचा राग अनावर झाला आहे. या गोष्टीची झळ नवीन कर्णधार हार्दिक पांड्याला प्रत्येक सामन्या दरम्यान सोसावी लागत आहे.(Rohit Sharma Hardik Pandya)
हैद्राबाद, गुजरातमधील ट्रोलिंगनंतर आता राजस्थान बरोबरच्या सामन्या दरम्यान देखील हार्दिक पांड्याला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. परंतु या वेळी घडलेल्या एका प्रकाराने पुन्हा एकदा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्मा हार्दिकच्या समर्थनार्थ चाहत्यांना शांत राहण्याचं आवाहन करताना पाहायला मिळाला आणि प्रेक्षकांनी देखील रोहितच्या या कृतीच सोशल मीडियावर तोंडभरून कौतुक केलं.
रोहितच्या या कृतीमुळे हार्दिक-रोहित यांच्यामध्ये भांडण असल्याच्या चर्चांना काहीसा पूर्णविराम मिळालेला दिसला. रोहितच्या आवाहनानंतर चाहते देखील काही काळ शांत झालेले पाहायला मिळाले.
सलग तीन पराभवांनंतर आता मुंबई इंडियन्स आणि कर्णधार हार्दिक पांड्या कोणत्या नवीन स्ट्रॅटजीनुसार संघाला विजय मिळवून देणार ही पाहणं रंजक ठरणार आहे. तसेच रोहित शर्मा पुन्हा ऍक्शनमोड मध्ये दिसणार का हे पाहण्यासाठी देखील चाहते उत्सुक दिसत आहेत. राजस्थान विरुद्धच्या पराभवानंतर मुंबईचा पुढील प्रवास अवघड होताना दिसतोय. प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मा, ईशान किशन, रमण धीर या आघाडीच्या खेळाडूंना लवकर डगआऊटमध्ये परतावे लागले आणि मुंबईचा पुढचा प्रवास खडतर झाला. अवघ्या १२६ धावांमध्ये मुंबईच्या संघाला समाधान मानावे लागेल. राजस्थानचा स्टार गोलंदाज ट्रेंट बोल्टने या सामन्यात महत्वाची भूमिका पार पाडत मुंबईची पहिली फळी बाद करण्यात मोठे योगदान दिले. (Rohit Sharma Hardik Pandya)
फलंदाजी नंतर लक्ष वाचवतांना मुंबईच्या गोलंदाजीने देखील प्रभावी मारा करत राजस्थान संघाला रोखण्याचा प्रयत्न केला. जसप्रीत बुमराह-आकाश मढवाल यांच्या प्रभावी माऱ्यासमोर राजस्थानचे काही फलंदाज अपयशी ठरले, परंतु राजस्थानच्या रियान परागच्या दमदार अर्ध शतकीय खेळीने राजस्थानचा या सामन्यातील विजय निश्चित केला.