‘सूर नवा ध्यास नवा’ या रिऍलिटी शोची सध्या विशेष चर्चा रंगली आहे. या शोचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होत आहे. दरम्यान या नव्या पर्वात नव्या अँकरची एन्ट्री झाली आहे. आतापर्यंत या कार्यक्रमाच्या सर्व पर्वांचं सूत्रसंचालन अभिनेत्री स्पृहा जोशी करत होती. आता मात्र स्पृहाची जागा एका मराठमोळ्या अभिनेत्रीने घेतली आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून आहे रसिका सुनील. रसिकाने आजवर तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर रसिकाने पदार्पण केलं आहे. (Rasika Sunil On Spruha Joshi)
मराठमोळी अभिनेत्री रसिका सुनील ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. ही बातमी सोशल मीडियावर पडताच अनेकांनी रसिका सुनील व स्पृहा जोशी यांची तुलना करायला सुरुवात केली. यावर अखेर रसिकाने मौन सोडलं आहे. ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत रसिकाने स्पृहा व तिच्यात होणाऱ्या तुलनेवर भाष्य केलं आहे.
‘सूर नवा ध्यास नवा’ म्हटलं की स्पृहाचं नाव आधी यायचं, आता तू स्पृहाच्या वरची छाप पाडणार आहेसच अर्थात तू प्रेक्षकांना नाराज करणार नाही आहेस, तर त्याच असं काही दडपण आलं होत का? काय सांगशील याबद्दल? असा प्रश्न रसिकाला विचारला असता, रसिका म्हणाली, “नाही. सुरुवातीला असं काही माझ्या मनातही आलं नव्हतं. पहिल्यांदा बाहेरूनच हे काय ते माझ्या कानी आलं. मला असं वाटलंही नव्हतं की अशी काही तुलना केली जाईल. वा असं स्वतःहून माझ्या डोक्यात खरंच काही आलं नाही. जेव्हा याबाबतच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या, त्याखालील कमेंट्स जेव्हा मी वाचू लागले, तेव्हा माझ्या लक्षात आलं. खरतर एखादी भूमिका माझ्या नंतर वेगळ्या कलाकाराने साकारली तेव्हा कसं वाटत हे मला चांगलंच माहित आहे. आपलं बाळ एखाद्याच्या हातात सोपवताय आणि त्याला सांगताय की आता यापुढे तू याची काळजी घे, असं काहीसं बरेचदा घडत.”
“त्यामुळे मी समजू शकते की, स्पृहाच्या मनात काय सुरु असेल. आणि म्हणूनच मी स्वतः तिला प्रेमाने मॅसेज केला आणि तिला सांगितलं की, “हे तुझं बाळ आहे, आणि मी फक्त त्याच संगोपन करणार आहे. तू निर्माण केलेली जागा मी फक्त सांभाळणार आहे. यावर तिचाही खूप गोड रिप्लाय मला आला, स्पृहा म्हणाली, “तुला काहीही मदत लागली तर तू मला सांग.” मला असं वाटतंय, हा बदल अर्थात चांगल्या मनाने स्वीकारला आहे. एखादा बदल स्वीकारणं हे आजच्या कलाकारांना उत्तम जमतं. मला असंही वाटत की, प्रेक्षकांनी या गोष्टीचं टेन्शन घेऊ नये. आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न करून तुमचं मनोरंजन करत असतो.”