Apurva Nemlekar Emotional : मालिकांमुळे अनेक कलाकार मंडळी लोकप्रियता मिळवतात. ही कलाकार मंडळी त्यांच्या अभिनयाने रसिकांच्या मनात घर करतात. मात्र जेव्हा मालिका निरोप घेतात तेव्हा मात्र या कलाकारांना त्यांचा चाहतावर्ग मिस करताना दिसतो. अशातच आता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. दरम्यान, मालिकेतील कलाकार मालिकेचा शेवट जवळ येताच भावुक झालेले दिसले. मालिकेत सावनी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर मालिकेच्या शेवटाला घेऊन भावुक झालेली दिसली. यानिमित्त तिने स्वतःचे काही मालिकेतील काही फोटो शेअर करत भावुक पोस्ट लिहिली आहे.
अपूर्वा लिहिते, “‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचं शेवटचं शूटिंग पूर्ण झालं. खरंतर, कसं व्यक्त होऊ हे कळत नाही आहे कारण, माझ्या मनात आता असंख्य भावना दाटून आल्या आहेत, जवळजवळ दोन वर्षांचा हा प्रवास होता. अनेक आव्हानं, नव्या गोष्टी शिकण्याची संधी आणि आयुष्यात आलेल्या सुंदर अनुभवांनी परिपूर्ण असा हा प्रवास होता. शेवंताची भूमिका ते सावनी हा प्रवास एक अभिनेत्री म्हणून देखील खूप काही शिकवून गेला. हा दोन वर्षांचा प्रवास अजिबातच सोपा नव्हता. आम्ही सुद्धा कठीण काळ अनुभवला आहे. पात्र बदलली, काही कलाकार मध्येच सोडून केले, सतत होणारे बदल या सगळ्या परिस्थितीत आम्ही खचलो नाही. ती आमची एकप्रकारे परीक्षाच होती. पण, काहीही झालं तरी, काम करतानाचा उत्साह, धमाल, मजा या सगळ्या गोष्टींमध्ये कोणतीच कमी भासणार नाही याची आम्ही काळजी घेतली. आपल्या कामाप्रती असलेली कमिटमेंट सर्वात महत्त्वाची असते. एक कलाकार म्हणून आपल्या संपूर्ण टीमच्या साथीने उभं राहणं खूप महत्त्वाचं असतं”.
पुढे तिने लिहिलंय, “जाणीवपूर्वक सावनीची भूमिका स्वीकारली होती कारण, मला नकारात्मक पात्र साकारण्याचा अनुभव घ्यायचा होता जेणेकरुन माझ्या कामात नवीन रंगछटा जोडता येतील, स्वतःला नवीन आव्हानं देता येतील. सावनीचा लूक, तिचे दागिने, तिचे संवाद आणि तिची देहबोली मी सगळं काही आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आणि या पात्राला पडद्यावर जिवंत केलं. सावनीला या पात्राला टीकेचा सामना सुद्धा करावा लागला कारण नकारात्मक पात्रावर जेव्हा टीका होते तेव्हाच तुम्हाला तुमच्या कामाची पोचपावती मिळते. या पात्रासाठी मला ‘सर्वोत्कृष्ट खलनायिका’, ‘द मोस्ट ग्लॅमरस फेस ऑफ द इयर २०२४’ असे पुरस्कार देखील मिळाले. पण, तुम्हा सर्वांचं प्रेम हे मला मिळालेलं सर्वात मोठं बक्षीस होतं”.
शेवटी ती आभार व्यक्त करत म्हणाली, “‘शशी-सुमीत प्रोडक्शन’, ‘स्टार प्रवाह’ आमची संपूर्ण टीम, आमच्या मालिकेची क्रिएटिव्ह टीम, लेखक, माझे सहकलाकार, माझ्यावर विश्वास ठेवणारे, माझ्या पाठिशी उभे राहणारे आणि सावनीला घडवण्यास मदत करणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानू इच्छिते. या मालिकेचा निरोप घेणं हे सोपं नाही पण, म्हणतात ना… काहीतरी नवीन सुरु करण्यासाठी तुम्हाला आधीचं काहीतरी संपवावं लागतं. तसंच काहीसं झालं आहे. मी लवकरच एका नवीन पात्रासह, एका नवीन कथेसह तुम्हा सर्वांच्या भेटीला येईल. सावनी तुमचा निरोप घेतेय”.





