हिंदी कलाविश्वातून छोट्या पडद्यावर हिंदी प्रेक्षकांबरोबर ‘पवित्र रीश्ता’ निर्माण करत मनोरंजन सृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी गोड, सोज्वळ व सुंदर अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे. त्याचबरोबर तिने ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेद्वारे मराठी प्रेक्षकांचेदेखील चांगलेच मनोरंजन केले. या मालिकेतील तिच्या नेहा या पात्राला चांगलीच लोकप्रियता मिळाली. छोट्या पडद्याबरोबरच तिने ‘मितवा’, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’, ‘कॉफी आणि बरंच काही’ अशा अनेक चित्रपटांद्वारे सिनेमाचा मोठा पडदाही गाजवला.
अशाप्रकारे मालिका व चित्रपटांद्वारे तिने अल्पावधीतच स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. प्रार्थनाने २०१७ मध्ये अभिनेत्रीने अभिषेक जावकरशी लग्न केलं. लग्न झाल्यानंतर तिच्या सासरच्या मंडळींकडून या क्षेत्रात कार्यरत राहण्यासाठी पाठिंबा कसा मिळाला याविषयी प्रार्थनाने नुकत्याच एका मुलाखतीत भाष्य केले आहे. प्रार्थना आता मुंबई सोडून कायमची अलिबागमध्ये स्थायिक झाली आहे. तिथे त्यांचं मोठं फार्महाऊस असून त्यात घोडे व इतर प्राणीदेखील आहेत, ज्यांची प्रार्थना व तिचा नवरा काळजी घेतात.
सुरेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात तिने याविषयी आपले मत मांडले आहे. यावेळी तिने असं म्हटलं की, “माझं लग्न झाल्यानंतर मी ३ वर्षे काम करणं बंद केलं होतं. मी तेव्हा खूप जास्त काम करत नव्हते. वर्षातून एखादं दुसरा चित्रपट करत होते. कारण मला तेव्हा माझ्या सासू-सासऱ्यांना आणि माझ्या नवऱ्याला वेळ द्यायचा होता. त्यामुळे मी फार काम करत नव्हते. अगदीच मोजकं काम करत होते. तर तेव्हा माझ्या सासूबाई मला म्हणाल्या तू काम का करत नाहीस. अशी घरी का बसून आहेस, तुझ्यात टॅलेंट आहे तर तू काम केलं पाहिजे.”
यापुढे प्रार्थनाने असं म्हटलं की, “‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेचा पहिला दिवस होता तेव्हा माझ्या नवऱ्याने मला एक भलामोठा मॅसेज केला होता आणि त्यात लिहिलं होतं की, मी फक्त कॅमेऱ्यावर काम करण्यासाठी बनली आहेस. मी तुझ्याशी यासाठी लग्न नाही केलं की तू प्रार्थना बेहेरे आहेस किंवा तू फक्त माझी बायको बनून घरी बसावी. मी तुझाशी लग्न केले कारण तुझ्यात टॅलेंट आहे आणि तू कॅमेऱ्यासाठी बनली आहेस्. त्यामुळे तू कायम काम करत राहशील हे लक्षात ठेव.”