‘आई कुठे काय करते’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणून अश्विनी महांगडेला आज संपूर्ण महाराष्ट्रभरात ओळखली जाते. मालिकेतील तिच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. शिवाय, ती अनेक चित्रपटांमध्ये झळकली असून तिचा एक चित्रपट लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. याव्यतिरिक्त ती एका संस्थेच्या माध्यमातून समाजसेवा करताना दिसली. (Ashwini Mahangade Facebook Post on her father)
सोशल मीडियावर अश्विनी महागंडे प्रचंड सक्रिय आहे. तिच्या अनेक फोटोशूट्सची नेहमीच चर्चा होते. त्याशिवाय, ती विविध विषयांवर व्यक्त होताना दिसली आहे. अशीच एक पोस्ट नुकतंच सोशल मीडियावर केली, ज्यामध्ये ती तिच्या वडिलांबद्दल बोलताना भावुक झाली आहे. अश्विनीने एक फोटोशूट केलं असून या त्यामागे काही लाकडं दिसत आहे. या फोटोशूटसह ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.
अश्विनी या पोस्टमध्ये म्हणाली, “काही फोटोशूट हे अर्थपूर्ण असतात. अर्थात हे फोटोशूट मी माझ्या घरी केले. आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की मागे लाकूड आहे, जळण पडलंय, कसली तरी मशीन आहे आणि हे कसले घर? तर माझ्या वडिलांनी सुरुवातीच्या काळात कामधंदा सुरू करताना अनेक वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला. पण जम बसला नाही, तरीही प्रयत्न मात्र थांबले नाहीत. त्यावेळी कुणाच्या तरी शेतातील सुकलेले झाडं, शेतात बांधावर असलेले बाभळीचे झाड ते विकत घेवु लागले आणि सुरू झाला माझ्या बापमाणसाचा लाकूडतोड्या हा व्यवसाय. अतिशय कष्टाचा हा व्यवसाय. तेव्हा गॅस नव्हते त्यामुळे चुलीसाठी जळण, घर बांधण्यासाठी फळ्या, आणि मयतीसाठी जळण असा त्याचा वापर व्हायचा. या कामात त्यांची साथ माझ्या मम्मीने तर दिलीच पण त्याहीपेक्षा जास्त साथ ही त्यांच्या आईने दिली. रोज वखारीत जावून बसायला लागायचे. ते काम आज्जी करायची. १-१ पैशाचा हिशोब रात्री ती नानांना सांगायची.”
हे देखील वाचा – ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्याला डेट करत आहे ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’मधील नेत्रा?, ‘त्या’ फोटोंनी वेधलं लक्ष
पुढे ती म्हणते, “माझे वडील खूप अभिमानाने सांगायचे की मी लाकूडतोड्या आहे आणि मला आपली लोखंडाची कुऱ्हाडच प्रिय. एक उत्तम कलाकार असूनही केवळ आपल्या कुटुंबासाठी, पोटापाण्यासाठी वेगळे क्षेत्र निवडून त्यावर प्रेम केले आणि त्याचा आम्हालाही आदर आहे. मयतीसाठी लागणारे लाकूड ही आपल्यासाठी फार साधी गोष्ट असेल पण त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची. कारण मेलेल्या माणसाला अग्नी दिल्यानंतरच त्याची मुक्ती होते आणि त्यासाठीचे एक महत्त्वाचे काम आपण करतो असे ते समजायचे, आता आम्ही सुद्धा तेच मानतो. कोरोनाच्या काळात कुणीही नातेवाईक साध्या आजाराने जरी कोणाचा मृत्यू झाला तरी खांदा द्यायला तयार नव्हते. त्यावेळी ते कामही त्यांच्यावर पडले किंवा त्यांनी ते स्वीकारले. आणि मृतदेह आमच्या पिकअपमधून घेवून जाणे हे एक काम वाढले. त्यांनी हे काम करावे, अशी माझी इच्छा अजिबात नव्हती कारण यात त्यांना कोरोना होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. पण त्यांना असे कायम वाटायचे की हे देवाने माझ्यावर जबाबदारीने टाकलेले काम आहे. हे काम त्यांनी शेवटपर्यंत केले आणि यातच त्यांना कारोना झाला.”
हे देखील वाचा – समीर चौघुलेंचा व्हिडिओ शेअर करत हेमांगी कवीने सांगितलं हिंदीत काम न करण्याचं कारण, म्हणाली “हे सत्यघटनेवर…”
“आजही ती वखार आहे. त्यांच्याशिवाय पण त्यांच्या तत्वांवर. हळूहळू अनेक गाड्या आल्या, वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी संधी शोधल्या आणि काम सुरू केले पण आजही एक काम निष्ठेने केले जाते आणि ते म्हणजे मयतीसाठी जळण दिलं जातं. मम्मी म्हणते यात फायदा नाही झाला तरी हे काम बंद नाही करायचे कारण हीच आपली सुरुवात आहे आणि सेवा. लवकरच महालय पंधरवडा सुरू होईल. ४ माणसं घरी येतील, जेवतील. पण गेलेल्या माणसाचे विचार हे महत्त्वाचे आहेत.”, असं ती या पोस्टमध्ये म्हणाली. तिच्या या पोस्टवर कलाकारांसह अनेक नेटकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया देत भावना व्यक्त केल्या आहे.