साऊथ सिनेसृष्टीतील कलाकारांचा साधेपणा व शालीनता साऱ्यांनाच प्रभावित करते. ज्युनियर एनटीआर असो, विजय देवरकोंडा किंवा महेश बाबू असो ही दिग्गज कलाकार मंडळी नेहमीच त्यांच्या साधेपणाने प्रेक्षकांची मन जिंकतात. अशातच सेलिब्रिटी फोटोग्राफर व अनुभवी पापाराझी वरिंदर चावलाने या कलाकारांबाबत काही खुलासे केले आहेत जे धक्कादायक आहेत. त्याने एका मुलाखतीत म्हटले आहे की, “हे साऊथचे कलाकार खऱ्या आयुष्यात जेवढे विनम्र दिसतात किंवा दाखवतात तेवढे नाहीत. काही साऊथचे कलाकार खोटेपणाचा आव आणतात आणि त्यांचा सर्व साधेपणा केवळ कॅमेरासाठी असतो”. (know about south superstar)
गेल्या काही वर्षांत, विशेषत: करोना महामारीनंतर हिंदी सिनेसृष्टीतही साऊथ कलाकारांची आवड वाढली आहे. काही गैरसमजांमुळे अनेक प्रेक्षकांचा बॉलीवूडवर भ्रमनिरास झाला आहे. तर दक्षिणेकडील चित्रपट हिंदीत प्रदर्शित झाल्यामुळे या चित्रपटांनी अनेक रेकॉर्ड्स मोडले आहेत. याच कारणामुळे बॉलिवूड कलाकारांची तुलना साऊथच्या सुपरस्टार्सबरोबर केली जाऊ लागली. विशेषत: तेलुगु, तामिळ, मल्याळम आणि कन्नड इंडस्ट्रीतील कलाकारांचे त्यांच्या साधेपणासाठी व नम्रतेसाठी खूप कौतुक केले गेले. पण आता वरिंदर चावलाने ज्या प्रकारचे खुलासे केले आहेत ते चाहत्यांच्या धक्कादायक आहेत.
‘हिंदी रश’ला दिलेल्या मुलाखतीत वरिंदर चावलाला साउथ कलाकारांच्या सोशल मीडिया इमेजबद्दल विचारण्यात आले. यावर, विजय देवरकोंडा ते ज्युनियर एनटीआरचा उल्लेख करत हे कलाकार आपला संयम कसा गमावतात याबद्दल त्याने स्पष्ट सांगितले. तो म्हणाला, “खरं सांगायचं तर मला वाटतं ते ढोंगी आहेत. ते फक्त कॅमेरासाठी साधेपणाचा आव आणतात. चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळी चप्पल घालून कॅमेऱ्यासमोर नम्रतेचा आव आणणारा एक अभिनेता होता. जेव्हा वरिंदर चावला यांना विचारण्यात आले की ते विजय देवरकोंडाबद्दल बोलत आहेत का, तेव्हा त्यांनी हो असं म्हणत उत्तर दिले. तो पुढे म्हणाला, “अलीकडेच माझ्या टीमने एका मोठ्या साऊथ कलाकाराचा व्हिडीओ शूट केला, जो सहसा खूप शांत असतो. तो हॉटेलच्या आत जात असताना त्याने माझ्या टीमच्या एका सदस्यावर हल्ला केला. पण मी तो व्हिडीओ शेअर केला नाही. पण दुसऱ्या फोटोग्राफरने तो अपलोड केला”. वरिंदर चावलाने हे सांगताना ज्युनियर एनटीआरचे नाव घेतले नाही, परंतु नुकताच त्यांचा असाच संतापाने भरलेला व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला होता.
वरिंदर चावलाने पुढे महेश बाबू आणि तेलुगू सुपरस्टारने मीडियाच्या उपस्थितीत बॉलिवूडला कसे नाकारले होते याबद्दलही भाष्य केले. तो म्हणाला, “ही घटना ‘मेजर’ चित्रपटाच्या कार्यक्रमातील आहे. त्यात सहभागी होण्यासाठी महेश बाबू बेंगळुरूमध्ये होते. आम्हाला बॉलिवूडची गरज नाही, असे ते उघडपणे सांगत होते. चावला म्हणाला, ‘मला वाटलं ही कसली वृत्ती? मला वाटते की हे अधिक अनुकरण आहे. हे कलाकार स्वतःची तुलना बॉलीवूडशी करतात तर निदान बॉलीवूड कलाकार तरी अशा खोट्या गोष्टी बोलत नाहीत किंवा असे ढोंग करत नाहीत. हिंदी कलाकारांना राग येत असेल तर ते जाहीरपणे व्यक्त करतात”.