‘झी मराठी’वरील ‘पारू’ या मालिकेत एका मागोमाग एक रंजक वळण येत असतानाच पारूच्या होणाऱ्या नवऱ्याचा खरा चेहरा आता सर्वांसमोर आलेला पाहायला मिळत आहे. अजयची मालिकेतून एक्झिट झालेली पाहायला मिळत आहे. पारूला फसवून अजय तिचा गैरवापर करणार असतो इतक्यातच आदित्य पारूच्या मदतीला धावून जातो आणि तिला सुखरूप घरी घेऊन येतो. अहिल्यादेवी किर्लोस्कर यांना जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा त्याही खूप विचलित होतात. त्यानंतर अहिल्यादेवी पारुला भेटायला तिच्या घरी जातात. (Paaru serial Update)
पारू अहिल्यादेवी समोर मन मोकळं करत असते. अहिल्यादेवी सांगतात, “तू माझ्यासमोर कोणतीही गोष्ट बोलू शकतेस. तुला काही बोलायचं असेल तर तू माझ्याशी बोल”. यावर पारू तिच्या मनातलं सगळं अहिल्यादेवीसमोर बोलून मोकळी होते. अजयने तिचा कसा फायदा घेतला, आदित्यने यातून कसं सोडवलं, हे सर्व काही अहिल्यादेवींना ती सांगत असते. त्यावेळी पारू असंही बोलून जाते की, “माझी आई असती तर मी आईच्या पदराला धरून ढसाढसा रडले असते”. हे ऐकून अहिल्यादेवी स्वतःचा पदर पारुसमोर करतात. पारू अहिल्यादेवींचा पदर घेऊन रडू लागते. त्यानंतर अहिल्यादेवी पारूला घेऊन बाहेर येतात आणि मारुतीला सांगतात की, “यापुढे पारूच्या लग्नाची जबाबदारी ही किर्लोस्करांची असेल आणि तुझ्या कुटुंबाची जबाबदारी ही किर्लोस्करांचीच आहे. आणि पारूला समजावतात की, हा दिवस तुझ्या आयुष्यात आलाच नाही असं समजून उद्यापासून तू कामाला सुरुवात कर.
अहिल्यादेवी किर्लोस्कर मेन्शनमध्ये जात सगळ्यांना बोलावून घेतात आणि सांगतात की, प्रीतमचा साखरपुडा झाला की, पारूच्या लग्नाची जबाबदारी ही किर्लोस्करांची आहे. त्यामुळे त्यात कोणताही अडथळा येता कामा नये. किर्लोस्करांच्या इब्रतीप्रमाणे पारूचं लग्न झालंच पाहिजे. यावर सगळेजण मान डोलावतात. तर अहिल्यादेवीचा नवरा हा तिच्या या निर्णयाचं भरभरून कौतुक करतो. अहिल्यादेवी प्रीतमच्या कामावरही भरपूर खुश असतात.
दामिनी स्वतःला मारून घेत असते, कारण दिशाने तिचा केलेला पानउतारा दामिनीला सहन झालेला नसतो. आता दामिनी दिशाचा काटा काढणार का?, हे पाहणं रंजक ठरेल. तर शेवटी अहिल्यादेवी प्रीतमला साखरपुड्यासाठी तू तयार आहेस ना?, असं विचारतात. आता साखरपुड्यासाठी प्रीतम तयार असणार का?, प्रीतम यावर काय उत्तर देणार?, हे पाहणं मालिकेच्या आगामी भागात रंजक ठरेल.