कठोर, बेधडक व्यक्तिमत्व असलेल्या अभिनेत्याच्या यादीत एक नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे अभिनेते नाना पाटेकर यांचं. मराठी सिनेसृष्टीसह बॉलिवूड सिनेसृष्टीत आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारे अभिनेते म्हणजे नाना पाटेकर. नानांनी आजवर त्यांच्या नारळासारख्या आतून गोड आणि बाहेरून कठोर असलेल्या स्वभावाने प्रेक्षकांची मन जिंकली. सध्या नाना पाटेकर चर्चेत आहेत ते व्हॅक्सिन वॉर या चित्रपटामुळे.व्हॅक्सिन वॉर या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटात नाना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. (Nana Patekar On His Death)
या चित्रपटानिमित्त नाना बऱ्याच ठिकाणी मुलाखती देत आहेत. दरम्यान नानांनी दिलेली एक मुलाखत सध्या साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. कारण या मुलाखतीत त्यांनी आपल्या मृत्युबद्दल भाष्य केलं आहे. मृत्यूनंतर लागणाऱ्या आपल्या सरणाची लाकडंही त्यांनी काढून ठेवली असल्याचं, या मुलाखतीदरम्यान म्हटलं आहे.
मृत्यूबाबत भाष्य करताना नाना पाटेकर म्हणाले, “माझा मृत्यूवर विश्वास आहे. कधी ना कधी माणसाला जायचंच आहे. सरणावरची बारा मन लाकडंच माझी प्रॉपर्टी आहे. शेवटी जाताना तेवढंच सोबत घेऊन जायचंय. मी माझ्या अंतिम संस्काराची १२ लाकडं ठेवली आहेत. माझ्या मृत्यूनंतर त्याचाच वापर करा. ओली लाकडं वापरू नका. नाहीतर जळताना धूर होईल आणि माझ्या मित्रांच्या डोळ्यात उगाच पाणी येईल. त्यांच्या डोळ्यात धुरामुळं पाणी येईल, पण मला वाटेल माझ्यासाठी रडतायत का काय. मृत्यूवेळी गैरसमज व्हायला नको. कुणी कुणासाठी रडत बसत नाही. तुम्ही गेल्यानंतर ४ दिवसांनी कोणी तुमची आठवणही काढत नाही.”
“मी माझ्या सिनेमातही हा संवाद वापरला आहे. मैने अपनी लकडी जमाँ कर के रखी है.. मी खरंच लाकडं गोळा करुन ठेवली आहेत. तर मी त्याला म्हणतो, ‘बेटे मैने अपनी लकडी जमा कर रखी है.. और वो सुखी लकडी है. तुम भी गिली लकडी इस्तेमाल मत करना. लोग जमा होंगे..धुआँ आयेगा दोस्त लोग, अगलबगल के लोगोंके आँखमे जाएगा और मरते वक्त गलतफैमी होगी मेरे लिये रो रहें है.’ हे आयुष्याचं वास्तव आहे. मृत्यूनंतर कुणीही तुम्हाला लक्षात ठेवत नाही.”