एकादा प्रश्न वेळीच सोडवला नाही तर तो दिवसेंदिवस अधिकाधिक अवघड होत जातो. त्यावरचे उत्तर हरवत जाते. त्यातील ‘चार्म’ ही निघून जाईल की काय अशी भीती वाटते. असाच एक ‘न सुटलेला प्रश्न ‘ मराठी चित्रपटाला शो मिळत नाहीत हा.सिंगल स्क्रीन थिएटर्सच्या काळात मराठी चित्रपटाला वितरक मिळत नाहीत, थिएटर मिळत नाहीत असा तो होता. मल्टीप्लेक्स युगात तो मराठी चित्रपटाला शो मिळत नाहीत, मिळाले तरी पहिल्या तीन दिवसांतील प्रतिसादावरुन ते कायम राहतील अथवा नाही याचे चित्र स्पष्ट होते. आणि इतकेच नव्हे तर मराठी चित्रपटाला प्राईम टाईम मिळत नाही असे दु:ख व्यक्त होते. मराठी माणूस मराठी चित्रपट पाहतच नाही असाही कधी सूर असतो.(Marathi Movies & Less Shows)
‘टीडीएम ‘ला अपेक्षित शो न मिळाल्याने दिग्दर्शक भाऊरावचं निराश होणं, त्याने फेसबुक लाईव्हवर आपल्या भावना व्यक्त करणं, आणि अगदी त्यातील नवीन कलाकारांना वाईट वाटणे, अश्रू अनावर होणे या गोष्टीने ” म्हणावे असे शो मिळत नाहीत” ही गोष्ट चर्चेत आली. सोशल मिडियात यावर बरीच चर्चा झाली. दिग्दर्शक सुनील सुखठणकर यांनीही बरीच सविस्तर पोस्ट लिहिली. एकाने मात्र स्पष्टपणे लिहिले, अनेक जण सोशल मिडियात मराठी चित्रपटांच्या समस्येवर आपली मते मांडत असतात, पण त्या प्रमाणात मराठी चित्रपट पाहतात का? खरंच विचार करण्याजोगा हा प्रश्न आहे. त्या मताशी कोणीही सहमत होईल.
प्रत्यक्षात मल्टीप्लेक्सवर जाऊन मराठी चित्रपटाचा प्रत्येक शो हाऊसफुल्ल करणे हा यावरचा उपाय आहे. ते न करता अनेक जण सोशल मिडियात व्यक्त होत राहतात, सल्ले देत राहतात अशाने हा प्रश्न कसा बरे सुटेल? केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर ‘ या चित्रपटाचेही पहिला आठवडा पूर्ण होण्यापूर्वीच काही शो कमी करण्यात आले हेही त्या कलाकृतीवर अन्यायकारक आहे.

दादाकोंडकेंचा ‘सोंगाड्या’ (Marathi Movies & Less Shows)
असं घडलं की कायमच दादा कोंडके यांनी आपल्या गोविंद कुलकर्णी दिग्दर्शित ‘सोंगाड्या ‘ ( १९७१) या हाऊसफुल्ल गर्दीतील चित्रपटाला उतरवून दादरच्या रानडे रोडवरील कोहिनूर थिएटरमध्ये ( आताचे नक्षत्र) विजय आनंद दिग्दर्शित ‘तेरे मेरे सपने’ प्रदर्शित केला जात असताना दादांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनाप्रमुखांची भेट घेऊन आपल्यावर अन्याय होतोय हे सांगताच कडवट शिवसैनिकांनी थिएटरला वेढा घालून ‘तेरे मेरे सपने’ ( प्रमुख भूमिकेत देव आनंद, मुमताज, हेमा मालिनी) प्रदर्शित होऊ दिला नाही याची आठवण करुन दिली जाते. त्यानंतर ‘सोंगाड्या’ने त्याच कोहिनूर थिएटरमध्ये पन्नास आठवड्यांचा मुक्काम केला आणि दादा कोंडके यांनी त्यानंतर शिवसेनेच्या प्रचंड सभेत भाषण देणे सुरु केले.(Marathi Movies & Less Shows)
मला आठवतय, त्यानंतरही आमच्या गिरगावातील मॅजेस्टीक सिनेमागृहात ‘तुलसी विवाह ‘ ( १९७२) हा हिंदी पौराणिक चित्रपट प्रदर्शित होऊ न देता तेथे मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यात यावा यासाठी आंदोलन करण्यात आले होते. पूर्ण गिरगावात याची चर्चा झाली. त्यानंतर कमलाकर तोरणे दिग्दर्शित ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ ( १९७७) या चित्रपटाला सेन्ट्रल थिएटर मिळावे यासाठी आमदार प्रमोद नवलकर यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी आंदोलन केले याची बातमी मार्मिकमध्ये प्रसिद्ध झाली होती.
हे देखील वाचा – “मोठी गाडी नाही म्हणून आदिनाथला वाटायची लाज”
कालांतराने डिजिटल युगात मराठी चित्रपटाची निर्मिती झपाट्याने वाढली, ती सोपी झाली आणि वर्षभरात शंभरपेक्षा जास्त चित्रपट मराठीत निर्माण होऊ लागले, एकाच शुक्रवारी चार पाच मराठी चित्रपट प्रदर्शित होऊ लागले आणि सिंगल स्क्रीन चित्रपटगृह मिळवणे, मल्टीप्लेक्समध्ये शोज मिळवणे या प्रश्नाने अधूनमधून डोके वर काढले. आता वृत्तवाहिन्यांवर यावर ‘उलटसुलट ‘ चर्चा होऊ लागली. त्यात एक मुद्दा आणि गुद्दा असतो, दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपटावर तिकडचा पब्लिक जसं प्रेम करतो, आवर्जून आपल्या भाषेतील चित्रपट पाहतो तसं मराठी माणूस मराठी चित्रपटाबाबत का करत नाहीत? याला उत्तर देताना कायमच म्हटलं जाते? आवर्जून पहावेत असे मराठीत चित्रपट तरी किती बनतात? आणि जेव्हा बनतात तेव्हा त्या चित्रपटाना हमखास हाऊसफुल्ल गर्दीचे सुख लाभते
हे मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, नटरंग, दुनियादारी, काकस्पर्ष, मुंबई पुणे मुंबई ( पहिला, दुसरा), लय भारी, पोस्टर बाॅईज, मुरंबा, सैराट, नटसम्राट, कट्यार काळजात घुसली, वेड, वाळवी अशा अनेक चित्रपटांच्या यशाने सिध्द झालेच आहे. कोणत्याही भाषेतील सर्वच्या सर्व चित्रपट दर्जेदार नसतात आणि सर्वच चित्रपट लोकप्रिय होत नसतात. तोच अलिखित नियम मराठीलाही आहेच.
न मिळणारे शोज आणि मराठी चित्रपट (Marathi Movies & Less Shows)
एका बाजूस असे चित्र आहे तर दुसरीकडे असं सांगावेसे वाटते की, खरंच प्रत्येक मराठी चित्रपट अधिकाधिक शोजना प्रदर्शित करणे आवश्यक आहे का? त्यामुळेच प्रेक्षकांची विभागणी होते आणि शोज दुर्दैवाने रिकामे दिसतात आणि चुकीचे चित्र निर्माण होते. ते जास्त घातक आहे. पूर्वी म्हणजेच प्रिन्टच्या काळात दक्षिण मुंबईत एक थिएटर ( सेन्ट्रल अथवा राॅक्सी), दक्षिण मध्य मुंबईत एक थिएटर ( भारतमाता), मध्य मुंबईत एक थिएटर ( प्लाझा, कोहिनूर अथवा शारदा), पश्चिम उपनगरात एक थिएटर ( टोपीवाला अथवा अनुपम), ईशान्य मुंबईत एक थिएटर ( शरद), पूर्व उपनगरात एक थिएटर ( उदय) एवढ्याच प्रमाणात अथवा थोडं कमी जास्त होत मराठी चित्रपट प्रदर्शित होत, तेवढंही पुरेसे होते, मराठी माणूस आवर्जून मराठी चित्रपट पाह्यला येई.
तसाच तो आजही येईल आणि भविष्यातही नक्कीच येईल. पण काही नियोजन असावे असे वाटत नाही का हा मराठी चित्रपटावरील प्रेमाखातर प्रश्न आहे. मिडिया कायमच मराठी चित्रपटाला भरभरुन सपोर्ट सिस्टीम देतेय. तर मग ‘मराठी चित्रपटाला शो मिळत नाहीत, मराठी माणूस मराठी चित्रपट पाहतच नाही’ असं म्हणण्यात खरंच अडकून पडणे आवश्यक आहे का? एकादा मराठी चित्रपट दणदणीत यशस्वी ठरतो आणि सगळेच प्रश्न सुटलेत असे वाटते, त्यापेक्षा चित्रपटसृष्टीतील अनेक घटकांनी एकत्र येऊन यावर सकारात्मक निर्णय घ्यावा आणि मल्टीप्लेक्समधील शोचे नियोजन ( अथवा रेशनिंग म्हणूया) करावे हीच आग्रहाची विनंती.
दिलीप ठाकूर