‘अग्निहोत्र’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’, ‘उंच माझा झोका’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी. आपल्या अनोख्या व वेगळ्या धाटणीच्या भूमिकांनी स्पृहाने कायमच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. स्पृहा ही केवळ एक अभिनेत्रीचे नव्हे तर एक उत्तम कवयित्रीदेखील आहे आणि एक उत्तम संवादकसुद्धा. स्पृहाच्या अभिनयासह कवितांना चाहत्यांकडून कायमच प्रोत्साहन मिळत आले आहे. काही दिवसांपूर्वीच आलेल्या ‘लोकमान्य’ या मालिकेतील तिच्या भूमिकेचेही चांगलेच कौतुक झाले होते. या मालिकेत तिच्यासह अभिनेता क्षितिश दातेही होता.
चाहत्यांना त्यांच्या आवडत्या कलाकाराची एखादी गोष्ट आवडत असल्यास ते त्यांची पसंती दर्शवतात. मात्र आपल्या आवडत्या कलाकाराची एखादी गोष्ट खटकत असेल तर ते त्याबाबतदेखील व्यक्त होत असतात. असंच काहीसं स्पृहाच्या बाबतीत काही वर्षांपूर्वी झालं होतं. काही वर्षांपूर्वी स्पृहाने तिच्या सोशल मीडियावर बॅकलेस ब्लाऊज घातलेला एक फोटो पोस्ट केला होता आणि त्यावरून प्रचंड गदारोळ झाला होता. यावर स्वत: अभिनेत्रीने तिचे मत मांडले आहे.
नुकतंच ‘आरपार’ या युट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पृहाने अनेक विषयांवर तिचं मत मांडलं. यावेळी तिला “काही वर्षांपूर्वी तू एक फोटोशूट केलं होतं बॅकलेस वाटेल असा तो ब्लाऊज होता. त्या फोटोमुळे तेव्हा प्रचंड गदारोळ झाला होता याविषयी तुला काय वाटतं? म्हणजे तो फोटो काढावा का वाटला आणि त्यावर लोकांच्या काय प्रतिक्रिया होत्या?” असा प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देत स्पृहाने असे म्हटले की, “ही साधारण पाच ते सहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मुळात जेव्हा मी फोटोशूट केलं, तेव्हा त्यात फार काही रिव्हिलिंग नव्हतं. त्यात मी हॉल्टरनेक ब्लाऊज परिधान केला होता. पहिली गोष्ट म्हणजे, हॉल्टरनेक ब्लाऊज आतापर्यंत कोणी घातलेला नाही, अशातला काही भाग नव्हता. म्हणजे असं काही नाही की, आपण आपल्या आसपास हॉल्टरनेक ब्लाऊज घातलेलं कुणी बघितलेलंच नाही.”
यापुढे ती म्हणाली की, “दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे ती म्हणजे, एखादी व्यक्ती जर एका विशिष्ट पद्धतीची भूमिका करत असेल, तर ती व्यक्ती खऱ्या आयुष्यातही तशीच आहे असं अजिबात नसतं किंवा ती व्यक्ती तसं असण्याचा अट्टाहास करणेही योग्य नाही. यामुळे मला कामच करता येणार नाही. कारण, सतत मला अठराशेच्या शतकातील भूमिका कोणीच देणार नाहीत किंवा तसे प्रोजेक्ट्सही बनणार नाहीत.”
हेही वाचा – अयोध्येत बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी, पारंपरिक लुकने वेधले लक्ष, फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
यापुढे आपल्या भूमिकांबद्दल स्पृहाने असं म्हटलं की, “मी सतत त्याच त्याच भूमिका करत राहिले, तर प्रेक्षक आणि कालांतराने मी स्वत:ही कंटाळेन. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, स्वत:चा वेगवेगळ्या पद्धतीने शोध घेण्यासाठी आणि काहीतरी नवनवीन करण्यासाठीच आपण अभिनयाच्या क्षेत्रात येतो. वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आपल्याला परकाया प्रवेश करता यावा हे माझं अभिनय क्षेत्रात येण्याचं खरं कारण आहे.”