मराठी चित्रपटातील अप्सरा सोनाली कुलकर्णी तिच्या अभिनय आणि नृत्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत असते. सोनालीचा प्रवास मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सुरु झाला त्यानंतर ती हिंदी चित्रपटांमध्येदेखील दिसून आली. तिच्यातील अभिनय आणि नृत्याच्या कौशल्यामुळे तिने थेट दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये पाऊल ठेवले आहे. मराठीतील ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘नटरंग’,’मितवा’ व ‘पोस्टर गर्ल’ या चित्रपटांमध्ये केलेल्या भूमिकांसाठी तिला गौरवण्यात आले. हिंदीमधील ‘सिंघम रिटर्न’,’ग्रँड मस्ती २’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता अभिनयाच्या जोरावर ती साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांच्यासह मल्याळम चित्रपट ‘मलायकोट्टाई वालिबान’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्याने सोनालीने अभिनेत्री म्हणून आतापर्यंतचा प्रवास कसा होता हे सांगितले आहे. (Sonalee Kulkarni success journey)
‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटातून सोनालीने पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या समोर आली. या चित्रपटामध्ये सोनालीच्या नाजूक सौंदर्याने सर्वांचीच मने जिंकली. गावचा बाज असणाऱ्या ‘बकुळा…’ ला प्रेक्षकांनीदेखील अक्षरशः डोक्यावर घेतले. त्यानंतर ‘गाढवाचं लग्न’,’मितवा’, ‘इरादा पक्का’,’क्लासमेट’,’पोस्टर गर्ल’, ‘नटरंग’ असे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. ‘नटरंग’ चित्रपटामध्ये तिने सादर केलेल्या ‘अप्सरा आली’ या लावणीमुळे सोनालीला स्वतःची एक वेगळी ओळख मिळाली आणि ती मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा झाली. त्यानंतर मात्र तिने मागे वळून पाहिले नाही. हिंदीमध्ये तिने अजय देवगण, रितेश देशमुख सह झळकली.तिला चित्रपटांमध्ये यश मिळत गेले आणि यशस्वी भूमिकादेखील तिच्या पदरी पडल्या.
नुकत्याच ‘नवभारत टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सोनाली तिला मिळालेल्या यशाबद्दल व्यक्त झाली आहे. चित्रपटसृष्टीमध्ये तग धरल्यानंतर आणि एकामागून एक यशस्वी भूमिका मिळाल्यानंतरदेखील तिला काय ऐकावे लागले हे सोनालीने सांगितले. या मुलाखतीमध्ये सोनालीने खंत व्यक्त केली आहे. सोनाली म्हणते की,”मी म्हणजे एखाद्या मुलीने जर यश संपादन केले, नवीन गाडी खरेदी केली तर सह-कलाकाराशी तुलना केली जाते. जर माझ्या सह कलाकाराने गाडी घेतली, मोठे घर घेतले तर त्याला मेहनतीने मिळाले असे म्हटलं जातं”.
“पण तेच जर मी घेतलं तर ते राजकारण्याने, निर्मात्याने दिलं असे बोललं जातं. हे ऐकून मला फार वाईट वाटते. तेच दुसरीकडे मी वर्षाचे ३६५ दिवस व्यग्र असते असे देखील म्हणतात. महिलांबद्दल असे विचार का आहेत असा प्रतिप्रश्नदेखील केला आहे.” पुढे ती म्हणते की, “पुरुषांचे यश म्हणजे मेहनत आणि महिलांच्या यशाला मात्र कोणतीही किंमत नाही असे समजले जाते. महिलादेखील मेहनत करून यश मिळवू शकतात”. हे सोनालीने अधोरेखित केले आहे. सोनाली मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेत्री आहे. सोनाली तिच्या यशाचे श्रेय आई-वडिलांना देते. कोणाचाही हात पाठीवर नसताना तिने यश मिळवले आहे.