sharmishtha raut news updates : मराठमोळी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने आजवर अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत रसिकांच्या मनावर राज्य केलं. ‘बिग बॉस मराठी’ मुळे शर्मिष्ठा राऊत घराघरांत पोहोचली. सध्या अभिनेत्री निर्मिती क्षेत्रातही महत्त्वपूर्ण कामगिरी करताना दिसत आहे. वैयक्तिक आयुष्यामुळे शर्मिष्ठा बरीच चर्चेत राहिलेली पाहायला मिळाली. शर्मिष्ठाचे पहिले लग्न अमेय निपाणकर यांच्याशी झाले होते. आणि त्यांनतर त्यांनी २०१८ मध्ये घटस्फोट घेतला. यानंतर अभिनेत्री बऱ्याच त्रासातून गेली. त्यानंतर अभिनेत्रीने तेजस देसाईसह लग्नगाठ बांधली. घटस्फोटानंतरचा अभिनेत्रीचा काही काळ हा फार कठीण होता याबाबत अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.
शर्मिष्ठाने नुकतीच ‘लोकशाही वृत्तवाहिनी’ला मुलाखत दिली. यावेळी बोलताना ती म्हणाली, “त्या काळात आपलं आयुष्य आपल्याला बरंच काही शिकवून जातं. मी ‘बिग बॉस’मध्ये जेव्हा गेले होते तेव्हा सुद्धा मी हेच म्हटलं होतं की, मी लग्नाचा निर्णय घेतला होता. तो माझा निर्णय होता आणि तो चुकला. मी यासाठी कोणालाही दोष देणार नाही, आरोपही करणार नाही. जेव्हा न पटण्याची किंवा मतभेदाची सुरुवात होते तेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला चुकीचीच दिसत असते. या जगात प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो त्यामुळे मी इतकंच म्हणेन निर्णय माझा चुकला. माझे काही निर्णय चुकले तसे समोरच्या व्यक्तीचेही चुकले. दोन चांगली माणसं एकत्र आली म्हणजे सगळं चांगलंच होईल असं नसतं”.
आणखी वाचा – आदित्य पारुला मंगळसूत्र घालू शकेल का?, लग्नाचं सत्य किर्लोस्कर कुटुंबासमोर येणार का?, मोठा ट्विस्ट
“माझ्या त्या कठीण काळात माझं कुटुंब कायम माझ्याबरोबर होतं. आज ऑन कॅमेरा सुद्धा मी सर्वांना विनंती करते, वैष्णवी हगवणेसारखी प्रकरणं समोर येत आहेत. अशा बऱ्याच मुलींना घरी परत यायचं असतं. प्लीज त्यांना येऊद्या. माझ्या आई-वडिलांनी मला खूप साथ दिली. माझ्या पालकांचं एकच म्हणणं होतं, राणी तू काहीच काळजी करु नकोस. तुझा निर्णय ठरला आहे ना? आम्ही तुझ्या पाठिशी आहोत. आम्हाला कोणी विचारलं तर आम्ही सांगू हो आली आमची मुलगी परत. माझ्या बाबांनी मला खूपच साथ दिली”.
आणखी वाचा – “भारतात राहायचं असेल तर बंदूक हवीच”, ऋचा चड्ढाचं धक्कादायक विधान, लेकीच्या जन्मामुळे घाबरली अन्…
“माझ्या इंडस्ट्रीतल्या मित्रमंडळींनी सुद्धा मला खूप साथ दिली. ललित प्रभाकर, मधुगंधा कुलकर्णी, सुकन्या ताई, सीमा देशमुख, सुप्रिया पाठारे, हर्षदा खानविलकर, आशीष बेंडे असे खूप लोक आहेत सगळ्यांची मी नावंही घेऊ शकत नाही इतक्या लोकांनी मला या काळात मदत केली होती. मला कधीच या सगळ्यांमुळे एकटेपणा जाणवला नाही. आपल्याकडे घटस्फोट म्हटलं की सासूचा छळ, मारहाण होणं हेच लोकांना वाटतं पण, असं नसतं. संबंधितांमध्ये तात्विक मतभेद सुद्धा असू शकतं. नातं संपतं जेव्हा नात्याचं प्रेत झालेलं असतं, त्यात जीव उरलेला नसतो तेव्हा ते प्रेत जितके दिवस तुम्ही ठेवणार त्याला वासच येणार. मग तुम्ही कितीही अगरबत्त्या लावा किंवा गुलाबपाणी शिंपडा. त्यापेक्षा मग त्या नात्याला अग्नी द्यावा. मी ‘बिग बॉस’च्या घरात होते तेव्हा एक निर्णय घेतला. तेव्हा रेशम ताई, मेघा, आऊ, सई या सगळ्यांनी सांगून सांगून, माझं ब्रेन वॉश करुन मला तो निर्णय घ्यायला लावला होता. तो निर्णय म्हणजे, की मी माझ्या आयुष्याला दुसरी संधी देईन.” असं शर्मिष्ठाने सांगितलं.





