मराठी मनोरंजन विश्वात अभिनेता सुमित राघवन व त्यांची पत्नी चिन्मयी सुमित ही जोडी ‘एव्हरग्रीन कपल’ म्हणून ओळखली जाते. चिन्मयी व सुमित नेहमीच समाजाप्रती असलेल्या भावना मांडताना दिसते. बऱ्याच सामाजिक मुद्द्यांवर चिन्मयी सुमित भाष्य करताना दिसते. मराठी भाषेप्रती असलेलं प्रेम नेहमीच अभिनेत्रीच्या बोलण्यातून प्रकर्षाने जाणवतं. अशातच अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या मुलांना मराठी शाळांमध्ये दिलेल्या शिक्षणाबाबत भाष्य केलं आहे. (Chinmayee Sumeet On Marathi School)
चिन्मयी सुमितने नुकतीच सुरेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी बोलताना अभिनेत्री म्हणाली, “ज्या काळात इंग्रजी माध्यमांमध्ये मुलांना शिकवणी दिली जाते त्या काळात तू तुझ्या मुलांना मराठी शाळेत घातलंस हे का आणि त्याबद्दल लोकांनी दिलेली मत काय होती? काय सांगशील? असा प्रश्न आता अभिनेत्रीला विचारण्यात आला. यावर उत्तर देत चिन्मयी म्हणाली, “तुम्हाला जे उत्तम मिळालं आहे ते तुम्हाला तुमच्या मुलांना द्यायचं असतं, असं प्रत्येकाचं मत असतं. आणि मला असं वाटत, मी एका आयएस ऑफिसरची मुलगी आहे. माझ्या वेळेलासुद्धा हाच प्रश्न असायचा. कारण तेव्हा कोणत्याच ऑफिसरची मुलं मराठी माध्यमांत शिकायची नाहीत. शक्यतो अधिकाऱ्यांची मुलंही इंग्रजी माध्यमांत शिकायची. त्याकाळी इंग्रजी माध्यमांत कॉन्व्हेंट पद्धतीने शिक्षण दिलं जायचं. त्यामुळे आपल्या मुलांना संस्कार मिळावेत या हेतूने इंग्रजी नव्हे तर मराठी शाळांमध्ये घातलं जायचं. आता कॉन्व्हेंट नसून बऱ्याच इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत. काळाची गरज आणि पालकांचा रेटा पाहता इंग्रजी शाळा काढतात आणि त्यामुळे मराठीचा ओघ कमी होतो, असं चित्र मला हल्ली पाहायला मिळत आहे.”
यापुढे ती म्हणाली, “मला स्वतःला मुलांच्या बाबतीत निर्णय घेताना आपल्याला एक शासकीय मदत मिळू शकते. माझ्या आईशी मी याबाबत चर्चा केली. आपला भारत देश हा असा आहे की, अगदी युरोपमध्ये सुद्धा वा फ्रांसमध्ये गेलात तर तुम्हाला फ्रेंच भाषा येत नसेल तर तुमचं अडतं. फक्त भारत हा देश असा आहे, तुम्हाला एकही भारतीय भाषा आली नाही तर तुमचं काही अडत नाही. तर त्यांच्यामुळे जी मुलं मातृभाषेत शिकतात त्यांचा बौद्धिक विकास हा नक्कीच वेगळ्या पद्धतीचा असतो. माझ्या मुलाचं शिक्षण हे कधीही त्यांना जाचक वाटता कामा नये, ते सहज व आनंदाने शिकलं पाहिजे.”
चिन्मयी पुढे असंही म्हणाली की, “निरदला मराठी शाळेत घालायचं हा निर्णय घेतला तेव्हा सुरुवातीला नातेवाईकांकडून विरोध करण्यात आला. मोलकरणीच्या मुलांबरोबर तुमची मुलं शिकतील आणि मोलकरणीची मुलं ज्या भाषेत बोलतात, ते ज्या शिव्या देतात त्या शिव्या तुमची मुलं देतील, असं जेव्हा मला सांगितलं गेलं तेव्हा ही मुळात मला समस्या वाटत नाही. त्यामुळे माझी दोन्ही मुलं छान मराठी शाळेत शिकली, निरद आता पियानिस्ट आहे. आणि तो इंग्लिशमध्ये गाणी लिहितो. इंग्रजी शिक्षण व इंग्रजी मध्यमन्त शिक्षण या सर्वस्वी भिन्न गोष्टी आहेत. एखाद्या मुलाला कवी, चित्रकार बनण्यासाठी इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणं गरजेचं नसतं. कोविडच्या काळात बरेच पालक इंग्रजी वगळून मराठी शाळांमध्ये वळले. इंग्रजी ही भाषा म्हणून आलीच पाहिजे, ती आवश्यक आहे पण म्हणून माध्यम इंग्रजी असावं याची गरज नाही. भाषा हे संस्कृतीचं वाहन आहे.”