अभिनेत्री भार्गवी चिरमुलेने आजवर तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नाटक, मालिका, चित्रपट या तीनही क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत सिनेसृष्टीत आपलं स्थान निर्माण केलं. सध्या भार्गवी ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यस्त आहे. नुकत्याच झालेल्या ‘झी नाट्य गौरव २०२४’ या सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्रीने नाटकादरम्यानचा एक किस्सा सांगितला. नाटकादरम्यान अभिनेत्रीची झालेली फजिती तिने या किस्स्यादरम्यान सांगितली. (Bhargavi chirmule Incident)
भार्गवी हा किस्सा सांगत म्हणाली, “नाटक म्हटल्यानंतर किस्से, आयत्या वेळी काहीतरी गडबड होणं हे साहजिक आहे. पण, ती गडबड प्रेक्षकांपर्यंत पोहोचू न देणं यात कलाकाराच्या अभिनयाचा कस लागतो, असं मला वाटत. नुकताच घडलेला किस्सा म्हणजे ‘मर्डरवाले कुलकर्णी’ नाटक सध्या चालू आहे. हे कॉमेडी नाटक आहे. त्यामुळे आम्हा सगळ्यांना सतत भयंकर अलर्ट राहावं लागतं. पंच लाइन्स, टायमिंग हे सगळं विनोदी नाटकाचा एक भाग असतो. त्याच्यामुळे अनेक गोष्टींची व्यवधानं सांभाळत आम्हाला हे नाटक करावं लागतं”.
पुढे ती म्हणाली, “परवाच्या प्रयोगात असं झालं की अचानक एक क्षण आला. आणि हा क्षण प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात एकदा तरी नक्कीच येतो, की आपण त्या क्षणाला ‘ब्लॅंक’ होऊन जातो, आपल्याला पुढचं काहीच आठवत नाही. पुढे काय घडणार आहे, आपण कुठे आहोत, काय आहोत हे काहीच आठवत नाही. आपल्या डोळ्यांपुढे पूर्णपणे अंधारी येते. त्याला आम्ही कॉमेडी भाषेत ‘ब्लॅंक ऑफ इंडिया’ म्हणतो. अशी मी स्टेजवर पूर्णपणे ब्लॅंक झाले आणि तसं झाल्यानंतर कुठल्याही कलाकाराच्या डोळ्यांत ते दिसतं. समोरचा कलाकार जर तुमचा मित्र असेल, तर त्याला लगेच कळतं. वैभवलासुद्धा हे कळलं की, मला काहीच आठवत नाही. वैभवनं, माझ्याकडे बघून काय? असं विचारलं. तेव्हा मी खूप मनापासून ते वाक्य शोधत होते”.
हा किस्सा पुढे सांगत ती म्हणाली की, “जसं मी म्हटलं की, कॉमेडी नाटक असल्यामुळे एकावर एक अशी वाक्यं असतात. माझं ते वाक्यं तो घेऊ शकत नव्हता आणि ते वाक्य घेतल्याशिवाय नाटक पुढे जाणार नव्हतं. नाटकात निमिष कुलकर्णी आहे आणि त्याची पाठ असल्यानं त्याला ते कळत नव्हतं की मी विसरलीय. तो वाट बघतोय वाक्य का येत नाही आहे, मी विचार करतेय वाक्य काय आहे आणि एका पॉईंटला वैभवनं माझ्याकडे असे डोळे मोठे करुन वाक्य, असं म्हटलं आणि मग त्या क्षणाला मनात वीज चमकली आणि मला ते वाक्य आठवलं. फायनली मी ते वाक्य बोलली आणि म्हणून नाटक पुढे गेलं. नाही तर बराच वेळ नाटक तिथेच अडकून राहिलं असतं. पण, त्या दिवशी मी खरंच मनापासून रंगदेवतेची माफी मागितली की, माझ्या हातून काय चुकलं असेल, तर मला माफ कर. पण, पुन्हा कधी माझ्याच काय कुठल्याच कलाकाराच्या आयुष्यात असं होऊ नये. तेव्हा आपला सहकलाकार आपल्याला जे सांभाळून घेतो आणि आपण काहीच घडलं नाही, असं आपण दाखवतो. या दोन गोष्टी अभिनयाचा कस दाखविण्यासाठी एका कलाकारासाठी खूप आहेत”.