मराठीत टॉपच्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांचं नाव आदराने घेतलं जातं. अलका यांनी मराठी चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. ‘माहेरची साडी’ चित्रपट तर अजरामरच आहे असं म्हणणंही वावगं ठरणार आहे. फार कमी कलाकारांच्या नशिबी अशाप्रकारचे चित्रपट येतात. अलका यांच्याही नशिबी असे काही सुपरहिट चित्रपट आले आणि त्यांचं आयुष्यच बदललं. मात्र इंडस्ट्रीमध्ये मधल्या काही वर्षांमध्ये त्यांच्या कामाचा काहीच गाजावाजा नसताना मोठी दुर्घटना घडली. २००७च्या दरम्यान अलका यांचा अपघात झाला. मात्र निर्मात्यांनी त्यांच्याकडे पुरती पाठ फिरवली. काहींनी त्यांच्याकडून पैसे परत घेतले. तर काहींनी अविश्वास दाखवला. अलका यांचं वजनही तब्बल ११० किलो झालं होतं. याचबाबत त्यांनी आता खुलेपणाने भाष्य केलं आहे. (Alka kubal talk about her accident)
ITSMAJJA च्या ‘ठाकुर विचारणार’ कार्यक्रमात अलका यांनी हजेरी लावली होती. यावेळी अपघात, पाठीचं दुखणं आणि निर्मात्यांची न मिळालेली साथ याबाबत अलका कुबल यांनी भाष्य केलं. त्यांनी त्यावेळेची सत्य परिस्थिती सगळ्यांसमोर मांडली. अलका म्हणाल्या, “तेव्हा तर मी खूपच टॉपला असेन. नंतर काही जणांना घाईही असते. माझा जेव्हा कार अपघात झाला तेव्हा जवळजवळ मी सहा महिने बेडवरच होते. माझं वजन ११० किलो झालं होतं. मला ते सगळं सहन करणं, सर्जरीही झाली होती. लिलावती रुग्णालयातील डॉक्टर रामाणेंनी मला माझ्या पायावरती उभं केलं. आशालता वगैरे मला त्या रुग्णालयामध्ये डॉक्टरांकडे घेऊन गेल्या होत्या”.
“त्यावेळी माझ्या हातात लागोपाठ सहा चित्रपट होते. डॉक्टरांकडे चेकअपसाठी मी गेले. तेव्हा मी त्यांना म्हटलं की, रात्रीच्या गाडीने मी शूटसाठी निघणार आहे. तीन ते चार महिने मी येणार नाही. डॉक्टर तेव्हा मला म्हणाले की, अलका नाही तुला सगळं रद्द करावं लागेल. तुझा मणका तुटायला थोडाही गॅप नाही. तो पुन्हा तुटला तर जोडणं खूपच अवघड आहे. त्यामुळे ते मला म्हणाले की, उद्याच्या उद्या तुला सर्जरी करावी लागेल. लीलावती रुग्णालयात माझी सर्जरी झाली. मी सगळे शूट रद्द केले. मला वाटलं काहीजणं थांबतील. पण बऱ्याच जणांना घाई असते. काय काय जणांना रागही आला की, अचानक शूट का रद्द केलं?”.
“आमचं शूट करायचं मग ऑपरेशन करायचं ना? असंही काही लोक बोलले. कारण बहुदा त्यांना त्याचं गांभीर्य माहीत नव्हतं. असाही मला अनुभव आला. एक ते दोन निर्मात्यांनी तर मला दिलेली रक्कम परत घेऊन गेले. ही लगेच उभी राहू शकणार नाही असं इंडस्ट्रीभर झालं. कुलदीप पवार तर एका कार्यक्रमात म्हणालेले की, आता अलका कुबलची रंजना देशमुख झाली. त्यांना तर माहितही नव्हतं. आमची भेटही नव्हती झाली. हे ऐकून मला माझ्या मानलेला भावाचाही फोन आला. तो म्हणाला की, अलका तुला इतकं बरं नाही. मला वाटलं सगळं ठीक आहे म्हणून मी बघायलाही आलो नाही. माझी एक मैत्रीण आहे मोहिनी पटेल म्हणून तिने माझी सहा महिने खूप सेवा केली”.
“व्यायाम नाही, उठायला, बसायला त्रास होत होता त्यामुळे माझं वजन प्रचंड वाढलं. अजूनही मला खाली जमिनीवर बसता येत नाही. या सगळ्यामधून मी गेले. पण हाही अनुभव मी घेतला. पण अपघातावेळी मी माहेरची साडीसारखी टॉपला नव्हते. कारण हा अपघात २००७ मध्ये झाला होता. सहा-सात महिने मी काहीच काम केलं नाही. बारीक व्हायला मला खूप वेळ गेला. कारण मला जीम करता येत नव्हती. कारण चालणं आणि डाएट माझ्या हातात होतं. ते मी हळूहळू वजन कमी करत गेले”. अलका यांच्या जिद्दीची, मेहनतीची आणि कलेप्रती असणाऱ्या प्रेमाची खरंच दाद द्यावी लागेल.





