१००व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या नाट्य संमेलनाला आतापर्यंत अनेक कलाकार मंडळींनी हजेरी लावली. तर काही राजकीय मंडळींनीही उपस्थिती दर्शवली. पिंपरी-चिंचवड येथे सुरु असलेल्या या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरेही गेले होते. हा कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना त्यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. खालापूर टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा होत्या. यादरम्यान राज ठाकरे स्वतः रस्त्यावर उतरले. तेव्हा नेमकं काय घडलं? याबाबत स्वतः सिद्धार्थ जाधवने सांगितलं आहे.
राज ठाकरे यांच्या गाडीमधूनच सिद्धार्थ प्रवास करत होता. या प्रवासादरम्यान त्याला आलेला संपूर्ण अनुभव सिद्धार्थने सांगितला. तो म्हणाला, “राजसाहेब ठाकरे यांच्याबरोबर मी मुंबई ते पुणे असा प्रवास करत होतो. नाट्यसंमेलनाचा कार्यक्रम संपल्यानंतर त्यांच्याबरोबरच प्रवास सुरु होता. घरी परतत असताना खालापूर टोलनाक्याला त्यांनी ट्राफिकची रांग पाहिली. ते स्वतः गाडी चालवत होते. मीही त्यांच्या गाडीमध्ये होतो”.
“राज ठाकरे यांच्या पोलिसांच्या व्हॅनने त्यांना जाण्यासाठी रस्ता करुन दिला. पण ते स्वतः ट्राफिकमध्ये थांबले. आम्हाला काही कळायच्या आतमध्ये गाडीमधून उतरले. तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी त्यांच्या स्टाइलमध्ये समजावलं. आताच्या आता सगळ्या गाड्या सोडण्याचे आदेश दिले. जवळपास चार ते पाच किलोमीटर लांब वाहनांची रांग लागली होती. त्यातही एक कुठेतरी अॅम्बूलन्सही अडकली होती”.
हिऱ्यांचा वापर, युनिक डिझाइन अन्…; अमृता देशमुखचं मंगळसूत्र आहे फारच खास, सोशल मीडियावर रंगली चर्चा
“राज ठाकरे यांच्या आदेशानंतर लगेचच सगळ्या गाड्या सोडण्यात आल्या. एवढं करुनही ते स्वतः तिथे थांबले.अॅम्बूलन्स जाईपर्यंत ते उभे राहिले. पुढे प्रवासामध्ये जिथे जिथे टोलनाक्यावर ट्राफिक होतं तिथे गाड्या सोडण्याचे आदेश दिले आणि सगळ्यांना खडसावून सांगितलं. माझ्यासाठी हा विलक्षण अनुभव होता. नाट्यसंमेलनात ते कलाकारांविषयी जे बोलत होते तेही मला भावलं होतं”. सध्या सर्वत्र राज ठाकरे यांच्या या कामाचं भरभरुन कौतुक होत आहे.