Rohan Pednekar On Television Industry : मराठी मनोरंजन विश्वात आजकाल अनेक नवोदित कलाकारांचा वावर पाहायला मिळतो. यांत बरेचजण स्वतःचच प्रॉडक्शन हाऊस म्हणून अभिनयात येतात. तर काहीवेळेला ओळखीवर एक आवड म्हणून ते अभिनयक्षेत्रात येतात. आणि बरेचदा असं होतं की, या नवख्यांना भाषेचं, अभिनयाचं नीटसं शिक्षण नसल्याने ती मंडळी अशुद्ध बोलून आपली शोभा करुन घेतात. हो. अशीच बरीच उदाहरणे आहेत. आणि प्रेक्षकांच्या निदर्शनास या चुका पटकन येतात. यावरुन ही कलाकार मंडळी भाषेच्या कमी ज्ञानावरुन ट्रोलही होतात. अमुक अमुक कलाकाराला अभिनय येतच नाही अशी तक्रारही प्रेक्षकांकडून केली जाते.
आजकाल मालिकाविश्वात सुरु असलेले नवनवीन प्रयोगही अनेकांना खटकताना दिसत आहेत. आणि याबाबत प्रेक्षक मंडळीही चर्चा करताना दिसतात. याच कलाकारांच्या चुकांवर टेलिव्हिजन विश्वातील एका मराठमोळ्या अभिनेत्याने पोस्ट शेअर केली आहे. हा अभिनेता म्हणजे रोहन पेडणेकर. सावळ्याची जणू सावली, साधी माणसं, जय जय स्वामी समर्थ या मालिकांमध्ये रोहनने भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली. काही मालिकांच्या लेखनाची धुराही रोहनने उत्तमरीत्या साकारली आहे. अशातच टेलिव्हिजन विश्वातील सत्य परिस्थिती नेमकी काय आहे याचा खुलासा रोहनने त्याच्या फेसबुक पोस्टद्वारे केला आहे.
रोहन पेडणेकरची मालिकेतील सत्य परिस्थितीबाबत पोस्ट
रोहनने पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, “हल्लीच एका मालिकेची मुख्य अभिनेता म्हणून स्टोरी केली. त्या कथेसाठी मुख्य पात्र पाच ते सहा. त्यातील काही कलाकार खरंच धन्यवाद होते. खरंतर न राहवून ही पोस्ट लिहितोय. कारण खूप त्रास होत आहे. गेली १५ – २० वर्षे थिएटर, मालिका या क्षेत्रात वावरतोय पण सध्या चित्र भयानक दिसत आहे. कारण, काम करणारे काही कलाकार हे या क्षेत्राला हलक्यात घेत आहेत. हे काय मी असं करेन. मला सहज जमेल. व्यक्तिरेखेचा अभ्यास नाही. स्क्रिप्टचं वाचन नाही. साधं शुद्ध मराठी बोलता येत नाही. शुद्ध मराठी जाऊ दे. त्या-त्या पात्रांची भाषाही बोलता येत नाही”.

पुढे त्याने लिहिलंय, “एका महाभागाचं वाक्य होतं, “मी त्याच मुलीशी लग्न करणार” हा महाशय म्हणतोय, “मी त्याच मुलगीशी लग्न करणार” अनेक टेक झाले, दिग्दर्शक समजावून दमले. कसा बसा फायनल टेक घेतला. त्यानंतर हा नट मला विचारतोय. मुलगी हा शब्दच नसतो का. मी डोक्यावर हात मारला आणि म्हणालो मित्रा तुला प्रचंड वाचायचं आहे. वाचशील तर वाचशील. व्याकरण, भाषा, वाक्यप्रचार, वाक्यरचना यांचा काहीही अभ्यास नसलेली, स्वतःला अभिनेता-अभिनेत्री म्हणून मिरवणारी ही पिल्लावळ वाढत चालली आहे”.
शेवटी त्याने या क्षेत्रातील दिग्गजांना विनंती करत असेही म्हटलं आहे की, “माझी या क्षेत्रात महत्त्वाच्या पदी असणाऱ्या मान्यवरांना विनंती आहे, खूप खूप चांगले कलाकार हल्ली घरी बसून आहेत. ज्यांनी अनेक वर्षे थिएटर (एकांकिका नाटक) करुन यात यश संपादन केलं आहे आणि आजच्या घडीला अविरत काम करत आहेत, कृपया अशा गरजूंना संधी द्या. बऱ्याच ठिकाणी असा वाईट अनुभव येतो. काही ठिकाणी खरंच खऱ्या कलाकारांची दखल घेतली जाते, कदर केली जाते, पण काही ठिकाणी अभिनेता असलेल्याचा अभिनय करणाऱ्या कलाकारांना उगाचच डोक्यावर बसवलं जातं. अशाने खरे कलाकार संपले जात आहेत. संपवले जात आहेत आणि मारले जात आहेत”.





