अभिनेता पुष्कर जोग नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चेत असतो. अशातच नुकत्याच मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानामुळे पुष्कर चांगलाच अडकला आहे. हे प्रकरण आता अभिनेत्याला चांगलंच भोवलेलं पाहायला मिळत आहे. पुष्करने केलेल्या वादग्रस्त विधानामुळे बीएमसी कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. माफी मागा अन्यथा आंदोलन अटळ असा इशाराही बीएमसी अधिकाऱ्यांकडून देण्यात आला होता. (Pushkar Jog News)
जातीसंदर्भात सर्व्हे करण्यासाठी आलेल्या बीएमसी कर्मचाऱ्याबाबत पुष्करने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन “काल बीएमसीचे काही कर्मचारी माझ्या घरी आले आणि मला सर्व्हे करतोय अशी माहिती देऊन माझी जात विचारत होते. त्या कर्मचारी जर बाईमाणूस नसत्या, तर २ लाथा नक्कीच मारल्या असत्या… कृपया करुन मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका नाहीतर जोग बोलणार नाहीत डायरेक्ट कानाखाली मारतील” अशा आशयाची पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट पाहता बीएमसी कर्मचाऱ्यांनी यावर कार्यवाहीची घोषणा केली.

पुष्कर विरोधात मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तीव्र आक्षेप नोंदवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीत अभिनेत्यावर गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. हा सर्वत्र माजलेला गदारोळ पाहता, आता पुष्कर जोगने सोशल मीडियावर घडलेल्या प्रकाराबाबत दिलीगिरी व्यक्त केली आहे. त्याने त्याच्या सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची माफी मागितली आहे.
आणखी वाचा – “मला लग्न करायची हौस होती पण…”, जुई गडकरी लग्नासाठी आहे उत्सुक, म्हणाली, “योग जुळून…”
पुष्कर जोग पोस्ट शेअर करत म्हणाला की, “मी रविवारी एक पोस्ट केली होती. ज्या पोस्टचा हेतू हा फक्त आणि फक्त हेच सांगण्याचा होता की, मी केवळ माणूसकी हाच धर्म मानतो. अर्थात व्यक्त होताना बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल जे विधान माझ्याकडून गेलं त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण ते कर्मचारी त्यांना दिलेलं काम करत होते. वैयक्तिक बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल माझ्या मनात आदराचीच भावना आहे. माझ्या विधानामुळे ते दुखावले गेले असतील तर पुन्हा एकदा दिलगिरी” अशा शब्दांत त्याने बीएमसी कर्मचाऱ्यांची माफी मागितली.