आपल्या स्पष्ट, बेधडक व निर्भीड स्वभावामुळे कायमच चर्चेत असणारे मराठी अभिनेते म्हणजे किरण माने. किरण माने हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. सोशल मीडियाद्वारे ते त्यांची राजकीय व सामाजिक मते व्यक्त करत असतात. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारे किरण माने त्यांच्या अनेक परखड मतांमुळेही वारंवार चर्चेत असतात. याचसह ते सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही सातत्याने सोशल मीडियाद्वारे भाष्य करत आहेत.
किरण मानेंनी नुकतीच ‘कॉकटेल स्टुडिओ’ या युट्यूब वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्यासह राजकीय परिस्थितीबद्दल अनेक विषयांवर भाष्य केले. किरण मानेंनी काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला. मात्र किरण मानेंना एका मोठ्या पक्षातून उमेदवारीची ऑफर आली असल्याचा खुलासा त्यांनी या मुलाखतीमधून केला आहे.
यावेळी त्यांनी असं म्हटलं की, “व्यवस्था बदलायची असेल तर तुम्हाला राजकारणात यावं लागतं. यासाठी मी शिवसेनेत प्रवेश केला. मंत्रीपद मिळेल म्हणून तू गेला, असं मला अनेक जण म्हणाले. पण तसं काही नाही. मी आजपर्यंत कुठेही बोललो नाही. पण आज मी एक गौप्यस्फोट करतो की, लोकसभा २०२४ निवडणूकीसाठी मला भारतातल्या खूप महत्त्वाच्या मतदारसंघामधून एका खूप जुन्या व मोठ्या पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी मला ऑफर आली होती. पण मला हे शिवसेनेने सांगितलं असतं तर कर्तव्य म्हणून मी ती ऑफर स्वीकारलीही असती. पण तो पक्ष शिवसेना नव्हता. ही घटना फक्त मला, उद्धव ठाकरे व सुषमा अंधारे यांनाच माहिती आहे.”
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “यानंतर मी थेट मातोश्रीला फोन केला, उद्धवजींना मी हे सांगितले. त्यांना हे आधीच कळले होते, त्यांना मी म्हटले की शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्याबरोबर आणि शिवसेनेत आहे. शिवसेनेने सांगितलं तर मी ही जबाबदारी घेईन, अन्यथा मला हे नकोय, खरं तर तो पक्ष खूप मोठा होता. त्या मतदारसंघातून मी उभा राहिलो असतो तर ती राष्ट्रीय घडामोड झाली असती. मी तिथून निवडून आलो असतो तर खूप वादविवाद आणि नाव झालं असतं. पण मी नाही म्हणून सांगितलं, कारण, मला शिवसेनेशी द्रोह करायचा नाही. मी विद्रोही आहे. द्रोही नाही. मला कुठल्याही पदाचा, धनाचा मोह नाही. शेवटच्या श्वासापर्यंत मी ठाकरेंबरोबर राहणार”