अभिनेता कुशल बद्रिके आपल्या अफलातून विनोदी अंदाजासाठी ओळखला जातो. ‘जत्रा’ चित्रपटातून ब्रेक मिळालेल्या या अभिनेत्याला आज ‘चला हवा येऊ द्या’ या छोट्या पडद्यावरील शोमधून घराघरातून ओळख मिळाली. नाटक, चित्रपट व छोटा पडदा अशी तीनही माध्यमे गाजवणारा कुशल आपल्या अतरंगी अंदाजासाठी प्रसिद्ध झाला. पण कुशल केवळ विनोदी भूमिकेवर अवलंबून न राहता अनेक तऱ्हांच्या भूमिका करण्यासाठी धडपडतो. यामुळेच कुशलने ‘रावरंभा’ चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली, त्यालाही प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं. (kushal badrike)
एरव्ही विविध भूमिका करणारा हा लोकप्रिय अभिनेता सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असून तो नेमहीच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अनेक मजेशीर रील्स टाकण्याबरोबरच कुशल विविध घडामोडींवर आपलं मतही मांडत असतो. अशातच कुशलने इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत संतप्त भावना व्यक्त केलेली आहे.
सध्या देशभरात मणिपूर घटनेवरून मोठी खळबळ माजली आहे. अनेक ठिकाणी या घटनेचा निषेध होत असून सर्वसामान्यांसह कलाविश्वातील अनेक स्टार्सकडूनही या घटनेचा निषेध केला जात आहे. अभिनेता कुशल बद्रिकेनेही या घटनेचा निषेध करत पृथ्वीवर श्रीकृष्णाने अवतरण्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली आहे.
कुशलने केली भावना व्यक्त (kushal badrike on manipur violance)
कुशलने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर लाल शेडमधील एक सेल्फी फोटो पोस्ट केलं असून पोस्टमध्ये तो म्हणतो, “कौरवांनी द्रौपदीचे कपडे काढले खरे पण लाज निघाली ती पांडवांची…. ध्रुतराष्ट्राच्या नजरेने भरलेल्या ह्या समाजाचा मी सुद्धा एक हिस्सा आहे ह्याची मला प्रचंड कीव येते. मी हात जोडून वाट बघतोय श्री कृष्णाची आता त्याने अवतरण्याची गरज आहे. मी निषेध करतो मणिपुर घटनेचा.” कुशलच्या या पोस्टवर नेटकरी कमेंट्सद्वारे आपल्या भावना व्यक्त करत आहेत.
जत्रा, पांडू, भिरकीट अश्या अनेक चित्रपटांत दिसलेला कुशल बद्रिके लवकरच दिग्दर्शक संजय जाधव यांच्या आगामी चित्रपटात दिसणार असून यात प्रार्थना बेहरे, अभिनय बेर्डे हेदेखील दिसणार आहेत. शिवाय तो ‘स्ट्रगलर साला’ या वेबशो मध्येही दिसला होता. (kushal badrike instagram post)
हे देखील वाचा : ‘हे घाणेरडं कृत्य करणारी २-३ माणसं…’ मणिपूर घटनेवर संतापली हेमांगी कवी