मराठी मनोरंजन विश्वात काही कलाकारांची मैत्री इतकी घट्ट आहे, जी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान करून गेली आहे. अशोक सराफ-लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर-महेश कोठारे अशी अनेक नावे यात घेता येतील. पण या मैत्रीमध्ये एक असं त्रिकुट आहे, ज्यांची मैत्री अनेक वर्षांपासून असून ती अजूनही कायम आहे. ती म्हणजे, मराठीतील आघाडीचे दिग्दर्शक केदार शिंदे, अभिनेते भरत जाधव आणि अंकुश चौधरी यांची. (kedar bharat ankush friendship)
शाहीर साबळे यांच्या ‘महाराष्ट्र शाहीर’ कार्यक्रमातून पुढे आलेल्या केदार, भरत व अंकुश यांनी अनेक वर्ष मराठी मनोरंजन सृष्टी गाजवली आहे. या त्रिकुटांची मैत्री गेल्या ३५ वर्षांपासून असून या त्रिकुटाने अनेक नाटक व चित्रपट एकत्र केलेले आहेत. या तिघांच्या मैत्रीचे किस्से नेहमीच आपल्या ऐकण्यात येत असतात. पण एक काळ असा होता, जेव्हा या प्रसिद्ध त्रिकुटाची जोडी तुटणार होती. मात्र यामध्ये एक मित्र पुढे आला, आणि त्याने यावर तोडगा काढत आपली मैत्री जपली. नेमका काय आहे हा किस्सा, ते जाणून घेऊया आजच्या ‘जपलं ते आपलं’ या भागात.
२००१ मध्ये केदार शिंदे यांनी भरत जाधवला घेऊन ‘श्रीमंत दामोदर पंत’ हे नाटक रंगभूमीवर आणले होते. या नाटकात भरत यांनी ‘गोड गोजिरी’ या गाण्यावर आपल्या विनोदी ढंगात नृत्य सादर केलं होतं. त्याला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. मात्र, केदार यांनी तेच गाणं जेव्हा ‘सही रे सही’ या नाटकात घेण्याचं ठरवलं. तेव्हा भरत यांनी हे गाणं पुन्हा सादर करण्यास नकार दिला. पण, केदार शिंदे आपल्या निर्णयावरून ठाम होते. त्यामुळेच केदार आणि भरत यांच्यात जोरदार वाद झाला आणि भरत यांनी ‘सही रे सही’ नाटक सोडण्याचा निर्णय घेतला होता.
या दोघांमधील वाद जेव्हा अंकुश चौधरीला कळालं, तेव्हा अंकुशने तातडीने येत यावर तोडगा काढला. ‘गोड गोजिरी’ गाणं केवळ एका प्रयोगासाठी वापरायचं. मात्र जर हे गाणं रसिकांच्या पसंतीस उतरलं नाही, तर ते गाणं नाटकातून काढून टाकायचं, असं अंकुशने सांगितलं असता दोघांनी याला होकार दिला. पुढे हे गाणं जेव्हा ‘सही रे सही’ नाटकाच्या पहिल्या प्रयोगात प्रेक्षकांसमोर आलं, तेव्हा त्या गाण्याने टाळ्या आणि शिट्टयांनी नाट्यगृह अक्षरशः दणाणून गेले. ‘गोड गोजिरी’ गाण्याला व ‘सही रे सही’ नाटकाला आज २० हून अधिक वर्ष झाले, तरी याला प्रेक्षकांचा तितकाच प्रतिसाद मिळतो. शिवाय या गाण्यावरील दामुचे नृत्य आज सिग्नेचर स्टेप बनली आहे.
केदार, भरत आणि अंकुश हे कॉलेजच्या दिवसांपासूनचे एकमेकांचे घनिष्ठ मित्र आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक नाटकांमध्ये एकत्र काम केलेले आहे. ‘ह्यांचा काही नेम नाही’ या चित्रपटातही या तिघांनी एकत्र काम केले आहे. याचबरोबर जेव्हा केदार शिंदे अंकुश व भरतसह चित्रपट करता, तेव्हा त्यांच्या चित्रपटांमध्ये या दोघांमध्ये एक जण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत हमखास दिसतात. (kedar bharat ankush friendship)