२२ एप्रिल पहलगाममध्ये गेलेल्या पर्यटकांसाठी तसेच संपूर्ण देशासाठीच काळा दिवस ठरला. कोणी जोडीदाराबरोबर, कोणी कुटुंबाबरोबर तर कोणी मित्रमंडळींबरोबर पहलगामध्ये मजा-मस्ती करत होतं. भेळ, मॅगी खाताना अचानकच गोळीबार सुरु झाला. काही सेकंद कोणाच्या काहीच लक्षात आलं नाही. काही कळायच्या आतच पहलगाम व्हॅलीमध्ये रक्ताचे पाट वाहू लागले. तेथील प्रत्यक्षदर्शी पर्यटकांनी घटनेचा संपूर्ण थरार सांगितला. यावेळी किती क्रुरता, राग, द्वेष दहशतवाद्यांचा मनात असेल याची पुसटशी कल्पना आली. जो तो आपल्यासह आपल्या बरोबरच्या मंडळींचा जीव वाचवण्यासाठी धडपड करत होता. अशातच एका आईने केलेलं काम मनाला चटका लावणारं आहे. (pahalgam terror attack)
IB ऑफिसर मनीष रंजन पत्नी जया मिश्रा व दोन मुलांसह काश्मीर फिरायला आले होते. दरम्यान पहलगाममध्ये कुटुंब एकत्र एन्जॉय करत असताना ही दुर्घटना घडली. यामध्ये मनीष रंजन यांचा मृत्यू झाला. जया मिश्रा अजूनही शारीरिकदृष्ट्या सावरल्या नाहीत. स्वतःला सावरणंच कठीण झालं आहे. अशातच त्यांनी सांगितलेला एक प्रसंग अंगावर काटा आणणारा आहे. एक आई आपल्या मुलांसाठी काय काय करु शकते याची प्रचिती येते.
पतीला १०-१२ गोळ्या झाडल्या
जया मिश्रा यांनी सांगितलं की, “नाव व धर्म विचारुन आमच्यासमोरच मनिषवर १० ते १२ गोळ्या झाडल्या”. मुलांनी डोळ्यांसमोरच वडिलांच्या मृत्यूचा थरार पाहिला. मनिष रक्ताच्या थारोळ्यात पडून राहिले. पहलगामच्या त्या भागात गोळीबार तसेच जोर जोरात ओरडण्याचे आवाज सुरुच होते. जीव वाचवायचा असेल तर मुलांना घेऊन पळून जाण्यातच भलं असल्याचं जया यांना जाणवलं. यादरम्यान त्यांनी स्वतःला सावरत पळ काढण्याचा निर्णय घेतला.
बुरखा मागितला आणि घातला कारण…
नशिबाने नवरा हिरावून तर नेलाच पण त्याचवेळी आपल्या पोटच्या मुलांचा जीव वाचवण्यासाठीही एका आईची तळमळ सुरु होती. पहलगामचा तो डोंगर उतरत असताना जया यांनी मुलांच्या हातात असणारे सुरक्षा कवच काढून टाकले. हिंदू आहोत हे ओळखू नये म्हणून त्यांना हे करावं लागलं. सुरक्षा कवच काढून टाकल्यामुळेच तिच्या मुलांचा जीव वाचणार होता. पहलगामचा डोंगर पायी उतरत असताना तिला एक मुस्लिम महिला भेटली. तिच्याजवळ जया यांनी बुरका मागितला आणि तो परिधान केला.
मुलीला उचलून घेत नदी पार केली तितक्यात…
१० ते १२ किलोमीटर मुलांसह जया यांना उतरायचं होतं. क्षणाक्षणाला मृत्यू डोळ्यांसमोर दिसत होता. मध्येच नदीही होती. मुलीला कमेवर कसंबसं उचलून घेत नदी पार केली. जर रस्त्यात कोणी अनोळखी व्यक्ती भेटली तर त्यांना काय बोलायचं हे जया यांनी मुलांना सांगून ठेवलं होतं. अर्धा रस्ता गाठल्यानंतर त्यांची व सैनिकांची भेट झाली. मात्र दहशतवादीही सैन्याच्याच कपड्यांमध्ये होते. त्यामुळे विश्वास बसेना. सैनिकांनी जया यांना आम्ही मदतच करण्यासाठी आलो आहोत हा विश्वास पटवून दिला आणि त्यांच्याबरोबर घेऊन गेले. एका आईने अगदी हुशारीने आपल्या मुलांचा जीव वाचवला. मात्र जोडीदार गमावल्यामुळे जया मात्र आयुष्यभरासाठी एकट्या राहिल्या.