पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात संतापाचं वातावरण पाहायला मिळालं. २६ पर्यटकांनी या दहशतवादी हल्ल्यात आपला जीव गमावला. काही कुटुंबातील आधारवडच हरपला. सरकारद्वारे पीडित कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आपला माणूस गमावल्याचं दुःख कुटुंबियांना आयुष्यभरासाठी शांत बसू न देणारं आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारद्वारे अनेक कठोर निर्णय घेण्यात आले. सर्वच स्थरातून संतापाची लाट असताना पाकिस्तानी कलाकारांबाबतही चर्चा सुरु झाली. चित्रपटसृष्टीमधील अनेक मंडळींनी दहशतवादी हल्ल्याबाबत संताप व्यक्त केला. पाकिस्तानी कलाकारांनीही भारतात काम करावं का? हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. अशात आता पाकिस्तानद्वारे एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. (indian songs ban in pakistan)
बॉलिवूडमधील गाण्यांचे जगभरात फॅन आहेत. पाकिस्तानातही ही गाणी आवर्जून ऐकली जातात. पण आता पाकिस्तानी रेडिओ स्टेशनवर भारतातील गाणी ऐकायला मिळणार नाहीत. रेडिओ स्टेशनने भारतीय गाण्यांचा वापर करु नये असा पाकिस्तानने आदेश दिला आहे. पाकिस्तानने घेतलेल्या या निर्णयाची सध्या देशभरात चर्चा होत आहे. पाकिस्तानातील सूचना मंत्री यांनी याविषयी सांगतिलं. पाकिस्तान ब्रॉडकास्टर्स असोशिएशनचे प्रमुख शकील मसूद यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
ते म्हणाले, “या निर्णयामधून आमचं देशाप्रती प्रेम आणि आम्ही देश म्हणून संघटित आहोत हे दिसून येईल. या कठीण दिवसांमध्ये राष्ट्रीय एकता पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही एकत्र आहोत. भारताने पाकिस्तानी युट्युब चॅनल बॅन केल्यानंतर बऱ्याच दिवसांनी हा निर्णय घेण्यात आला आहे. समा टीव्ही, डॉन न्यूज सारख्या युट्यूब चॅनलला भारताने बॅन केलं आहे”. म्हणजेच आता पाकिस्तानमधील रेडिओवर भारतातील गाणी ऐकू येणार नाही हे स्पष्ट झालं आहे.
आणखी वाचा – “मीसुद्धा माझी लघवी प्यायली आहे”, परेश रावलनंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा दावा, म्हणाली, “सुंदर त्वचेसाठी आणि…”
भारताने पाकिस्तानी काही युट्यूब चॅनलवर बंदी आणली. त्यानंतर अनेकांनी या डिजिटल स्ट्राइकचं कौतुक केलं. त्याचबरोबरीने काही पाकिस्तानी कलाकारांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही बंदी आणली. काही पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट दिसत नसल्याचं अनेक भारतीयांच्याही निदर्शनास आलं. भारताचा हा डिजिटल स्ट्राइक देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे.