Indrayani River Kundmala Bridge : पुण्यात मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे रविवारी १५ जून एक दुर्घटना घडली. रविवारी दुपारी इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून काही पर्यटक वाहून गेले. या घटनेदरम्यान एकूण ५०च्या आसपास लोक वाहून गेले. या अपघातामध्ये चौघांचा मृत्यू झाला असून ३० हून अधिकजण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत मरण पावलेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सलग दुसऱ्या दिवशी या ठिकाणी मदतकार्य सुरु असतानाच या दुर्घटनेसंदर्भातील धक्कादायक तपशील समोर आले आहेत. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा त्या पुलावर जवळपास ५०च्या आसपास लोक उभी होती. त्यामुळे पुलावर वजन आल्याने हा पूल कोसळला असल्याचं बोललं जात आहे.
सध्या पुलाचे हे प्रकरण चर्चेत आलेलं पाहायला मिळत आहे. कुंडमळा येथील दुर्घटनाग्रस्त पूल हा अवघा ५० वर्ष जुना होता. मात्र या पुलाच्या दुरुस्ती आणि देखभालीकडे प्रशासनाकडून फारसे लक्ष दिले जात नव्हते. यामुळेच पुलाची स्थिती सतत खालावत गेली आणि जास्त भारामुळे तो रविवारी कोसळला. हा पूल राज्य सरकारने बांधला होता. पूल जुना झाला असल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. रविवारी १०० हून अधिक लोक सुट्टी एन्जॉय करण्यासाठी येथे जमले आणि पर्यटकांच्या जास्त वजनामुळे पूल कोसळल्याचं प्राथमिक माहितीनुसार सांगितलं.
आणखी वाचा – दहिसर टोल नाक्यावरील ट्राफिकमुळे जुई गडकरी त्रस्त, बराच वेळ एकाच जागी, म्हणाली, “या वाहतूक कोंडीत…”
इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून जी दुर्घटना झाली ती अत्यंत दुर्दैवी आहे… लोक वाहून गेलेत आणि संख्या आपल्याला माहीत नाहीये…
— Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) June 16, 2025
पूल ५० वर्षे जुना होता, त्याची दुरुस्ती करणं गरजेचं होतं!
सरकारने मंजुरी देऊनही काम सुरू झालं नाही!
सरकारने जागं व्हावं!!! असे पूल आपल्याकडे अनेक ठिकाणी… pic.twitter.com/fXu0238VhG
या प्रकरणावर अनेक राजकीय नेत्यांनी भाष्य केलं. यानंतर आता कलाविश्वातूनही या मुद्द्यावर भाष्य केलं जात आहे. दरम्यान, अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमेने ट्विट करत या प्रकरणावरुन सरकारला सवाल केला आहे. त्याने पूल कोसळल्याचा फोटो पोस्ट करत म्हटलं की, “इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून जी दुर्घटना झाली ती अत्यंत दुर्दैवी आहे. लोक वाहून गेलेत आणि संख्या आपल्याला माहीत नाही. पूल ५० वर्षे जुना होता, त्याची दुरुस्ती करणं गरजेचं होतं. सरकारने मंजुरी देऊनही काम सुरु झालं नाही. सरकारने जागं व्हावं. असे पूल आपल्याकडे अनेक ठिकाणी आहेत त्याकडे लक्ष द्या”.
आणखी वाचा – आई-बाबांसाठी शुभंकर तावडेने खरेदी केलं नवं घर, गृहप्रवेशासाठी एकत्र आलं कुटुंब, पाहा Inside Photo
पुढे त्याने असं म्हटलं की, “लाभार्थी योजनांना पैसे वाटप करताना दमछाक होते आणि काही गरजेच्या कामांना बाजूला ठेवलं जातं. त्याचं हे उत्तम उदाहरण. या घटनेत बेभान पर्यटकांचाही तितकाच दोष आहे, पावसाळ्यात काही टिकाणांना भेट देताना काळजी घ्यायला हवी. एवढं बेभान वागणं बरं नाही. त्या रील्सच्या नादात आपण किती बेजबाबदारपणे वागतो याचं थोडंही भान लोकांना राहिलं नाही. प्रशासनाकडून अशा ठिकाणी आता नियम घालून त्याची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे. नाहीतर रोज अशाच बातम्या येत आहेत”.





