Aai Kuthe Kaay Karte Archana Patkar: ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रचंड गाजली. ५ वर्षानंतर या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. टीआरपी शर्यतीत ही मालिका नेहमीच अव्वल स्थानावर राहिली. अरुंधती, अनिरुद्ध, संजना या सगळ्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आजही या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. इतकंच नाही तर मालिकेच्या कथानकाने नेहमीच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. मालिका निरोप घेत असताना अनेकांनी यावर नाराजी देखील व्यक्त केली. अरुंधती, अनिरुद्ध, संजना आणि इतर सगळ्या पात्रांना बांधून ठेवणारं एक पात्र म्हणजे कांचन. मालिकेतील कांचन आजीच्या पात्राने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आणि कांचन हे पात्रं ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना पाटकर यांनी साकारलं होतं. तसेच या मालिकेत आपण अनेकदा कांचनला गुडघेदुखीने त्रस्त असलेलं पाहिलं.
अशातच अर्चना पाटकर यांनी ‘इट्स मज्जाच्या’ ठाकूर विचारणार या कार्यक्रमाला नुकतीच मुलाखत दिली. यादरम्यान त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी गुडघेदुखीवर देखील भाष्य केलं. गुडघेदुखीच्या त्रासाबद्दल सांगताना त्या म्हणाल्या “आई कुठे काय करते या मालिकेत माझी भूमिका कांचन आजीची होती. संपूर्ण दिवस मालिकेचं शूटिंग सुरु असायचं आणि त्यादरम्यान बराचवेळ बसून राहायचे त्यामुळे मला नंतर गुडघेदुखीचा त्रास जाणवायला लागला. वय झाल्यानंतर वृद्ध माणसांना गुडघ्यांचा त्रास होतो हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. या मालिकेत माझी भूमिका आजीची असल्यामुळे मला देखील गुडघेदुखीचा त्रास आहे असं हुबेहूब या मालिकेत दाखवण्यात आलं होतं. मालिकेच्या सुरुवातीला मला गुडघेदुखीचा त्रास नव्हता पण मालिकेला ४ वर्ष झाल्यानंतर मला प्रचंड प्रमाणात गुडघेदुखी व्हायला लागली. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर त्यांनी ऑपरेशन सांगितले पण मालिका सुरु असल्यामुळे मला ऑपरेशन करणं शक्य नव्हतं त्यामुळे जवळपास एक वर्ष मी इंजेक्शन घेऊन त्यावर उपचार करत राहिले. यादरम्यान मला मालिकेच्या संपूर्ण टीमने खूप मदत केली.”
“मालिकेबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, “मालिकेच्या शूटिंगचा शेवटचा दिवस होता त्यादिवशी मी खूप भावुक झाले. पाच वर्ष एकाच टीमसह काम करून त्याच्याबाबरोबर खूप छान नातं झालं होतं. जवळपास पाच वर्ष या सेटवर आपण रोज येत होतो आणि उद्यापासून सेटवर यायचं नाही या भावनेने मी दुखावले घेणे होते.”




