बॉलिवूड सेलिब्रिटी ईशा देओल सध्या एका विशिष्ट कारणामुळे चर्चेत आली आहे. ईशा देओल पती भरत तख्तानी यांच्यासह लग्नाच्या ११ वर्षानंतर वेगळी झाली आहे. २०१२मध्ये लग्न झालेल्या या जोडप्याने दोघेही वेगवेगळ्या मार्गाला जात असल्याचं जाहीर केले. ईशा व भरत यांचे लग्न होण्याआधीच दीर्घ संबंध होते कारण त्यांची भेट शाळेत झाली होती. बरीच वर्ष त्यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली आणि त्यांचे कुटुंब व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत लग्न केले. लग्न झाल्यानंतर एकत्र कुटुंब पद्धती असलेल्या भरतच्या घरी जेव्हा ईशा राहायला गेली तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला. (Isha Deol Divorce)
२०२० मध्ये प्रकाशित झालेल्या तिच्या ‘अम्मा मिया’ या पुस्तकात त्या काळाची आठवण करुन, ईशाने शेअर केले की, लग्न झाल्यानंतर ती अधिक ‘प्रौढ, जबाबदार’ बनली आहे. तिने यांत लिहिले आहे की, “जेव्हा आम्ही २०१२ मध्ये लग्न केले तेव्हा अनेक गोष्टी बदलल्या होत्या. एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे सासरी गेल्यानंतर, दिवसभर शॉर्ट्स घालता येत नव्हते. त्यामुळे दैनंदिन जीवनातील बऱ्याच गोष्टी बदलाव्या लागल्या. अर्थातच, मी त्याच्या कुटुंबासह राहायला लागल्यानंतर, मी शॉर्ट कपड्यांमध्ये घरात वावरू शकत नव्हते, जसे की मी हे लग्नाआधी करायचे”.
यावेळी तिने सासरच्या अनेक गोष्टींचा खुलासा केला. तख्तानी घरातील सर्व स्त्रिया त्यांच्या नवऱ्यांसाठी स्वादिष्ट जेवण बनवायच्या आणि दुसरीकडे, ती भरतला भेटण्यापूर्वी तिला एकही पदार्थ बनवता येत नव्हता. ईशा म्हणाली की, ती तिच्या सासूचे याबाबत आभारी आहे कारण त्यांनी तिला स्वयंपाकघरात जाण्याचा किंवा सून म्हणून कोणतीही गोष्ट करण्याचा कधीही आग्रह धरला नाही.
ती याबाबत म्हणाली, “खरं तर माझी सासू मला नेहमी सांगते की मी तिच्या तिसऱ्या मुलासारखी आहे (भरत आणि त्याच्या भावानंतर). घरातील पहिली सून असल्याने माझे बरेच लाडही त्यांनी केले” असंही ती म्हणाली. ईशाने अशा बऱ्याच गोष्टींचा खुलासा तिच्या या पुस्तकात केला आहे.