bollywood director vivek agnihotri : काही दिवसांपासून बॉलिवूडचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री एका विशेष कारणाने चर्चेत आले आहेत. यापूर्वीही ते अनेकदा वादग्रस्त गोष्टींमध्ये अडकलेले पाहायला मिळाले. नेटकऱ्यांनी तर त्यांना अनेक मुद्द्यांवरुन ट्रोलही केलं. अशातच आता विवेक पुन्हा एकदा मराठी जेवणाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आलेले पाहायला मिळाले. मराठमोळ्या जेवणाला गरिबांचे जेवण म्हटल्याने त्यांच्यवर बरीच टीका झाली. या वादात ते इतके अडकले की मराठमोळ्या कलाकारांनीही विवेक यांना खडेबोल सुनावले. हे प्रकरण चांगलंच तापल्यानंतर आता विवेक यांनी स्वतःची बाजू मांडली आहे. त्या मुलाखतीदरम्यान विवेक यांनी केलेलं भाष्य हे गमतीत म्हटलं असल्याचं त्यांनी कबूल केलं.
नुकत्याच एका मुलाखतीत विवेक अग्निहोत्री यांनी मी तेव्हा ते मजामस्करीत बोलल्याचं सांगितलं. Curly Tales बरोबरच्या संवादात विवेक अग्निहोत्रींना पल्लवी जोशींनी कोणते मराठी खाद्यपदार्थ खायला सांगितले होते, असा प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाचं उत्तर देताना विवेक अग्निहोत्री म्हणालेले, “मी दिल्लीचा असल्याने मला झणझणीत आणि मसालेदार जेवणाची सवय होती. लग्नानंतर पल्लवीनं मला वरण-भात खा, असं म्हटले होते. पण त्या वरणामध्ये मीठसुद्धा नसतं. तेव्हा मला सुरुवातीला वाटायचं की, हे काय गरिबांचं जेवण आहे”. त्यानंतर विवेक अग्निहोत्रींवर सोशल मीडियाद्वारे बरीच टीका करण्यात आली. मराठी इंडस्ट्रीमधील नेहा शितोळे आणि दिग्दर्शक महेश टिळेकर यांनीसुद्धा त्यांच्यावर परखड शब्दांत टीका केली होती. त्यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर झालेल्या गदारोळावर आता विवेक अग्निहोत्रींनी स्पष्टीकरण दिलं आहे.
The Raunac Podcast ला दिलेल्या मुलाखतीत विवेक अग्निहोत्री म्हणाले, “आमच्याकडे Currly Tales ची मुलगी पॉडकास्ट करण्यासाठी आली होती, तेव्हा गप्पा मारताना दिल्लीहून मुंबईला गेलो, तेव्हा पल्लवी जोशीने मला वरण-भात खायला दिलं आणि तेव्हा मी मजामस्करीत असं म्हटलं की, त्यांच्या जेवणात मीठही नसतं. हे काय गरीब लोकांचं जेवण आहे वगैरे वगैरे… पण त्यानंतर मी हेही म्हटलं होतं की, मोठं झाल्यावर अक्कल आल्यानंतर मला कळलं की, भारतात सगळ्यात जास्त आरोग्यदायी जेवण हे महाराष्ट्रीयन जेवण आहे”.
आणखी वाचा – “नोरा फतेहीसारखी फिगर हवी”, नवऱ्याच्या मागणीने पत्नी त्रस्त, दिवस-रात्र जिमला पाठवायचा, उपाशी ठेवायचा आणि…
पुढे त्यांनी सांगितलं, “वरणभात हे माझं आवडीचं जेवण आहे आणि ते मी आता रोजच खातो. पण काही लोकांनी माझं सुरुवातीचं वाक्य एडिट केलं आणि मी महाराष्ट्रीयन जेवणाला गरीब जेवण म्हटल्याबद्दल माझ्यावर टीका केली. काही लोक वाक्य एडिट करुन चुकीच्या पद्धतीनं पसरवतात. मला आता कोणत्या वादात अडकायचं नाही”.





