बॉलिवूडची ड्रमा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत व तिचा नवरा आदिल खान दुर्रानी यांच्यातील वाद अजूनच पेटला आहे. या दोघांच्याही वादात आता इतर मंडळीही सामील झाली आहेत. राखीची खास मैत्रीण राजश्री मोर, शर्लिन चोपडा तसेच या वादात अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी वक्तव्य केलं. अभिनेत्री तनुश्री हीने नुकतीच राखीचा नवरा आदिल खान दुर्रानी याच्यासह पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत तिला नाना पाटेकरांबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा तिने नानांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्याबद्दल बोलून प्रमोशन करायचं नसल्याचं वक्तव्य केलं. तनुश्री दत्ताने २०१८मध्ये अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर विनयभंगाचे आरोप केले होते. (tanushree datta said nana patekar needs my name)
पत्रकार परिषदेत जेव्हा तनुश्रीने ‘मीटू चळवळी’बद्दल वक्तव्य केलं तेव्हा नाना पाटेकर व विवेक अग्निहोत्री यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. नाना पाटेकर व विवेक अग्निहोत्री यांसारख्या लोकांमुळे तिचं करीअर खराब झालं असल्याचं तिचं म्हणणं होतं. त्यामुळे तिला विचारण्यात आलं की, तिची कारकीर्द उद्ध्वस्त करणारी लोकं आजही मेहनत करत आहेत तसेच त्यांच्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळत आहेत. नाना पाटेकर, विवेक अग्निहोत्री यांचा ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटही प्रदर्शित होईल, असा प्रश्न करण्यात आला.
त्यावर उत्तर देताना तनुश्रीने नाना पाटेकरांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं, “नाना पाटेकर व विवेक अग्निहोत्रीसारख्या लोकांचा आता माझ्याशी काहीही संबंध नाही. आपण या लोकांबद्दल का बोलायचं? त्यांच्याबद्दल बोलून मला त्यांना प्रसिद्धी द्यायची नाही. आजही त्यांना त्यांचे चित्रपट चालवण्यासाठी माझ्या नावाची गरज आहे. २००८ मध्ये जेव्हा नाना पाटेकर यांच्याशी माझा वाद झाला होता. त्यावेळीही त्यांचा चित्रपट विकला जात नव्हता. त्यांची पात्रता तीच आहे. जेव्हा ते त्यांचे चित्रपट विकू शकत नाही, तेव्हा ते माझ्यासारख्या लोकांकडे येऊन आम्हाला एखादं गाणं करण्यास सांगतात. तसेच त्यांच्या चित्रपटात पाहूणी भूमिका करण्यास सांगतात. जेणेकरून त्यांचा चित्रपट विकला जाऊ शकेल”.
ती पुढे म्हणते, “नाना पाटेकरांकडे २००८ ला त्यांचा चित्रपट विकण्याची लायकी नव्हती आणि आजही त्यांच्याकडे त्यांचा चित्रपट विकण्याची लायकी नाही. म्हणूनच ते मीडियाला भडकवत असतात. जेणेकरून मीडिया मला त्यांच्या चित्रपटांबद्दल प्रश्न विचारेल. ज्यामुळे मी ज्वालामुखी होऊन काहीतरी उत्तर देईन. माझ्या या उत्तरामुळे त्यांच्या चित्रपटाला प्रसिद्धी मिळेल. तसंही ते आधीच रस्त्यावर आले आहेत. २००८ मध्ये ते रस्त्यावर आले होते. आता मला त्यांच्या चित्रपटाला कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी द्यायची नाही”, असं म्हणत तिने नाना पाटेकरांना प्रसिद्ध द्यायची नसल्याचं सांगितलं.