भारताच्या ५४व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात सुरु आहे. अनेक दिग्गज कलाकार मंडळी या महोत्सवात सहभाग घेताना दिसत आहेत. बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जी हिनेदेखील यावेळी हजेरी लावली होती. ‘कभी अलविदा ना केहना’ या चित्रपटाच्या माध्यमातून विवाहबाह्य संबंध व शारीरिक आकर्षण अशा दोन महत्त्वाच्या मुद्यांवर भाष्य केलं. चित्रपटाच्या रिलीजनंतर काय झाले याबद्दल सांगितले. (Rani Mukharjee International film festival)
अभिनेत्री म्हणाली की, “या चित्रपटाने भारतीय विवाहांबद्दलचे सत्य उघड केले आहे, ज्यामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. मला असं वाटतं की ‘कभी अलविदा ना केहना’सारखा चित्रपट पाहून बऱ्याच जोडप्यांनी घटस्फोट घेतले, कारण हा चित्रपट प्रेक्षकांनी अगदी टोकाचा विचार करूनच पाहिला. करणलाही या चित्रपटाकडून याच प्रतिक्रिया आल्या. या चित्रपटाने बऱ्याच लोकांचे डोळे उघडले. अनेकांनी हा चित्रपट पाहून स्वतःच्या आनंदाला प्राधान्य द्यायचं ठरवलं”.
पुढे राणी म्हणाली, “स्त्रीच्या इच्छा व तिची आवड याबद्दल भाष्य करायलाच हवं. एखादा पती केवळ आपल्या पत्नीला मारहाण करत नाही म्हणजे तो तिला सुखी ठेवत असेल, तिच्या शारीरिक तसेच भावनिक गरजा पूर्ण करत असेल, असा अर्थ अजिबात होत नाही, स्त्रियांचं मत याबाबतीत कधीच ग्राह्य धरलं जात नाही. खरंतर करणने ‘कभी अलविदा ना केहना’सारख्या बोल्ड चित्रपटातून हीच गोष्ट सांगायचं धाडस केलं. भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील हा काळाला बराच पुढे नेणारा चित्रपट ठरला” असं म्हणत तिने भारतीय सिनेमाबाबत भाष्य केलं.
या चित्रपटातील तिच्या माया या पात्राबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, “मायाच्या व्यक्तिरेखेची सुंदर गोष्ट म्हणजे ती ऋषीवर वेगळ्या क्षमतेने वा एक मित्र म्हणून प्रेम करत होती. खरं तर करण जोहरने असा चित्रपट बनवण्याइतपत धाडस त्या वेळी केलं. तेव्हा त्याला काय घडत आहे याची खात्री नव्हती. सशक्त चित्रपट व सशक्त भूमिकांसह उभं राहणं मला नेहमीच महत्त्वाचं वाटतं” असं म्हणत चित्रपटातील तिच्या भूमिकेबाबत भाष्य केलं.