बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितला ह्यूस्टनस्थित पाकिस्तानी वंशाचे प्रवर्तक रेहान सिद्दीकी यांच्याशी संबंध असल्याबद्दल तिला टीकेला सामोरे जावे लागत आहे. ज्यांचा आयएसआयशी संबंध असल्याचे आणि भारत सरकारने त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकले आहे. शुक्रवारी, सुनंदा वशिष्ठ यांनी माधुरी व रेहानच्या कार्यक्रमाच्या पोस्टरचा एक फोटो शेअर केला. हा कार्यक्रम ऑगस्ट २०२४ मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या एका दिवसानंतर, टेक्सासमधील ह्यूस्टनमध्ये होणार आहे. ट्विटरवर तिने रेहानबरोबर काम केल्याबद्दल माधुरी दीक्षितवर टीका केली आणि अभिनेत्रीला असे न करण्याची विनंती केली. त्यांनी भाजपचे मंत्री किशन रेड्डी यांचे चार वर्षे जुने पत्रही शेअर केले. (Madhuri Dixit Slammed)
या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “रेहानला भारत सरकारने ‘ब्लॅकलिस्ट’ केले आहे. सुनंदा यांनी लिहिले, “माधुरी दीक्षितने भारतीय एजन्सीच्या रडारवर असलेल्या आणि भारत सरकारने ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेल्या पाकिस्तानी वंशाच्या प्रवर्तकाबरोबर सहयोग केल्याचे पाहून धक्का बसला. गृह राज्यमंत्री किशन रेड्डी यांनी जाहीरपणे सांगितले होते की, ह्यूस्टनस्थित पाकिस्तानी वंशाचा प्रवर्तक रेहान सिद्दीकी यांना ब्लॅकलिस्ट केले आहे आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनाही त्याच्याबरोबर काम न करण्याची विनंती केली आहे”.
ती पुढे असंही म्हणाली की, “पाकिस्तानी वंशाच्या प्रवर्तकाबरोबर काम करण्याचे काही योग्य कारण आहे का?, ज्यावर आयएसआयशी संबंध असल्याचा आरोप आहे आणि ज्याला भारत सरकारने ब्लॅकलिस्ट केले आहे?. माधुरी दीक्षितचे मित्र, कुटुंब व चाहते तिला या माणसाच्या इतिहासाबद्दल सांगू शकतात का? आणि त्यांना नकार द्यायला सांगू शकतात का?. हे आपल्या सुरक्षा दलांसाठी आणि भारतीय सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर स्त्री-पुरुषांसाठी अत्यंत निराशाजनक आहे. मला आशा आहे की माधुरी दीक्षितला त्याच्याबरोबर काम न करण्याची बुद्धी येवो”.
या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिलेल्या पाहायला मिळत आहेत. या पोस्टवर प्रतिक्रिया देत एका नेटकऱ्याने म्हटलं की, “मी सहमत आहे की चित्रपटांतून पैसे नाहीत, पण रिॲलिटी शोमधून मिळणारी कमाई पुरेशी नाही का?, नवरा डॉक्टर आहे. रोजच्या खर्चासाठी हे सर्व काही कमी पडत आहे?”. तर आणखी एकाने लिहिले आहे की, “माधुरी दीक्षितने खरोखर निराश केले आहे. मला वाटते की बॉलीवूडमधील लोक विश्वासार्ह नाहीत, परंतु मला त्यांच्याबद्दल आदर होता. मला आता खात्री पटली आहे की ते सर्व समान आहेत”. तर एका चाहत्याने लिहिले की, “मी आयुष्यभर माधुरीचा खूप मोठा चाहता आहे. पण कोणत्याही किंमतीवर पैसे कमवण्याची ही हतबलता समजू शकत नाही. कलाकारांना दोष देऊ शकत नाही. त्यांचे व्यवस्थापक व सल्लागार काय करतात हे समजून घ्यायचे आहे. त्यांना कशासाठी पैसे दिले जातात?”, असा सवाल त्याने केला आहे.