Tharal Tar Mag New Promo : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ सध्या जबरदस्त वळणावर आली आहे. प्रत्येक भागात नवे ट्विस्ट आणि धक्कादायक खुलासे पाहायला मिळत असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढत चालली आहे. सायली आणि अर्जुनच्या भूमिकेत दिसणारे अभिनेता अमित भानुशाली आणि अभिनेत्री जुई गडकरी यांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली असून, त्यांच्या जोडीला प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसत आहे.
सध्या मालिकेच्या कथानकात एक मोठा खुलासा होणार आहे. आगामी भागांमध्ये रविराज किल्लेदार नागराजला जाब विचारताना दिसतो. “तो दोन दिवस घराबाहेर का होता?” असा थेट सवाल रविराज नागराजसमोर करतो. इतकंच नाही, तर २२ वर्षांपूर्वी घडलेल्या भीषण अपघातामागे महिपत शिखरेचा हात असल्याचा संशयही तो व्यक्त करतो. महिपत आणि त्याच्या माणसांपासून दूर राहण्याची ताकीद रविराज नागराजला देतो.
मात्र, प्रत्यक्षात त्या अपघाताचा खरा सूत्रधार नागराजच असतो. त्यानेच महिपतला रविराज आणि प्रतिमाला जीवे मारण्याची सुपारी दिलेली असते. दरम्यान, नागराजच्या वागण्यात होत असलेल्या बदलांमुळे सुमनच्या मनात संशयाचं बीज रोवू लागतो. ती प्रचंड घाबरलेली असते आणि अखेर सत्य लपवणं अशक्य झाल्याने ती सायली आणि अर्जुनकडे धाव घेते. घाबरत्या अवस्थेत अर्जुनच्या ऑफिसमध्ये पोहोचून ती म्हणते, “सायली, मला तुम्हा दोघांना काहीतरी सांगायचं आहे, २२ वर्षांपूर्वी भावोजी आणि वहिनींच्या अपघातासाठी माझा नवरा देखील जबाबदार आहे.”
सुमनचा हा खुलासा ऐकून सायली आणि अर्जुनला धक्का बसतो. पुढे बोलताना सुमन महिपतसह नागराजच्या मैत्रीबद्दल सांगणार असते, इतक्यात ऑफिसचा दरवाजा वाजतो. हे ऐकताच सुमन अधिकच घाबरते. नागराजला हे सत्य कळलं, तर तो आपल्याला ठार मारेल, अशी भीती सुमनच्या मनात घर करून राहते. आता नागराजचा अपघाताशी असलेला थेट संबंध आणि महिपतसहची त्याची मैत्री सायली-अर्जुनला समजल्यावर नेमक पुढे काय घडणार? व सायली आणि अर्जुन सुमनला कसं वाचवणार? आणि रविराजचा सख्खा भाऊच या अपघातामागे असल्याचं सत्य समोर आल्यानंतर सायली-अर्जुन पुढे कोणता निर्णय घेणार? हे पाहणं प्रेक्षकांसाठी अत्यंत रंजक ठरणार आहे.





