‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत सात वर्षांचा लीप आल्यापासून ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडताना पाहायला मिळत आहे. मालिकेत एकामागोमाग एक येणार रंजक वळण पाहणं प्रेक्षकांना उत्सुकतेच ठरत आहे. अर्जुन व अमोलची भेट कधी होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान अप्पी व अर्जुन यांच्यातला दुरावा कमी करण्यासाठी आता अमोल म्हणजे त्यांचा मुलगा स्वतः प्रयत्न करतानाही पाहायला मिळत आहे. मात्र अद्याप अर्जुन व अमोलची भेट झालेली नाही त्यामुळे ही भेट ही कधी होणार?, हे वडील मुलाचं नातं कधी बहरणार?, याकडेही साऱ्यांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत. (Appi Amchi Collector Promo)
अशातच मालिकेच्या एका प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या प्रोमोमध्ये तब्बल सात वर्षांनी अर्जुनसमोर अमोलचा चेहरा येणार आहे. अमोलला पहिल्यांदा पाहताना अर्जुनला भरुन आलं आहे. मात्र अमोल व अर्जुनची भेट ही प्रत्यक्षात होत नाही कारण अमोलला काही गुंडांनी किडनॅप केलेलं असतं. अमोल त्याच्या मामाबरोबर बाहेर आलेला असतो तेव्हा काही गुंड अमोलला घेऊन पळून जातात. त्यावर दीपेश अर्जुन व अप्पीला फोन करुन सांगतो.
अप्पी येऊन अमोलची चौकशी करते तितक्यात तिथे अर्जुन येतो. आणि तो अप्पीवर भडकतो की, “आता तू अमोलला इथे का घेऊन आलीस. तो उत्तराखंडला हॉस्टेलला होता ना?”, यावर अप्पीला काहीच कळत नाही ती विचारते की, “तू काय बोलत आहेस आणि कोणतं हॉस्टेल”. अप्पी सांगते की, “मी पुण्यात आले तेव्हाच अमोल माझ्याबरोबर आला आहे. गेले दोन महिने तो माझ्याबरोबर आहे”. हे ऐकून अर्जुन सांगतो, “मग तू त्याला माझ्यापासून दूर का ठेवलं?, त्याला तुला मला भेटवायचं नव्हतं ना?, असं म्हणत दोघे एकमेकांशी भांडू लागतात”.
यावर अप्पीचे बाबा दोघांना ओरडतात आणि शांत करतात. त्यानंतर अप्पी अर्जुनला अमोलचा फोटो दाखवते. अमोल म्हणजेच सिंबा हा त्याचा मुलगा असल्याचं समोर येताच अर्जुन रडू लागतो आणि त्याला सिंबाबरोबरचे खास क्षण आठवतात. आता किडनॅप केलेल्या अमोलला अर्जुन कसा शोधणार हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.