‘झी मराठी’ वाहिनीवरील सर्वच मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. या वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिकाही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. कारण अप्पी व अर्जुन दोघेही आता वेगवेगळ्या वाटेवर प्रवास करणार आहेत. काही वर्षांचा लीप घेत ही मालिका पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांसमोर आली आहे आणि त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. मालिकेत अप्पी व अर्जुन यांची ताटातूट झालेली पाहायला मिळत आहे. मात्र आता सात वर्षांनंतर अप्पी व अर्जुन एकमेकांसमोर येणार आहेत.
नुकताच काल (७ मे) रोजी या मालिकेचा एक प्रोमो प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये मालिकेच्या या नव्या प्रोमोमध्ये अप्पी व अर्जुन यांची भेट होताना पाहायला मिळत आहे. प्रोमोमध्ये असं पहायला मिळत आहे की, अमोल व अप्पी फिरायला जातात तेव्हा अमोलची टोपी खाल पडते. ती आणायला अप्पी खाली येते. टोपी उचलल्यानंतर अप्पीचा तोल जातो आणि ती खाली पडणार तेव्हा अर्जुन तिला पकडतो आणि तिला आधार देतो. तब्बल सात वर्षांनी अप्पी व अर्जुन यांची भेट झाली आहे.
अशातच आता आणखी एक नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये अमोल त्याच्या आई-वडिलांची भेट व्हावी म्हणून तो छत्रपती शिवाजी महाराजांसमोर त्याचं गाऱ्हाणं मांडताना दिसत आहे. यावेळी अमोल गोळेवाल्याला “काका तुम्ही आज महाराजांकडे काय मागितलं?” असं विचारतो आणि गोळेवाला अमोलला उत्तर देत असं म्हणतो की, “महाराजांना रयतेच्या मनातल्या सगळ्या गोष्टी कळतात. आपल्या महाराजांना रयतेचा राजा म्हणायचे. त्यांनी लोकांची कामे केली. त्यांच्या अडचणी सोडवल्या. त्यांच्यामुळे आपण आहोत, तर त्यांना आपल्या मनातलं कळणार नाही का?”
यानंतर मग अमोल महाराजांसमोर हात जोडून उभा राहतो आणि “इथे बाबांबद्दल कुणाला सांगावं ही मला कळतच नाही. मला माझ्या बाबांना भेटायचं आहे, कृपया मला त्यांना भेटवा” असं म्हणतो आणि त्यांच्या पाया पडतो. अशातच अप्पी-अर्जुन यांची भेटही होतानाचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता अमोलमुळे अप्पी-अर्जुन पुन्हा एकत्र येणार का? त्यांच्यात अमोलमुळे पुन्हा पूर्वीसारखे नाते निर्माण होणार का? हे पाहण्यासाठी मालिकेचे प्रेक्षक चांगलेच आतुर आहेत. मालिकेत पुढे काय होणारहे पाहण्यासाठी त्यांची उत्सुकता लागून राहिली आहे.