झी मराठी वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेने नुकतीच सात वर्षांची लीप घेतली, तेव्हापासून मालिकेच्या कथानकाला एक वेगळेच वळण आले आहे. या नवीन कथानकात अप्पी व अर्जुन यांचा मुलगा अमोल याचीही एंट्री झाली आहे. त्यामुळे अप्पी व अमोलची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना आवडत आहे. मात्र या लीपमुळे अमोल व अर्जुन यांची ताटातुट झाली असून अर्जुन व अमोल कधी एकत्र येणार आहे याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.
अमोल व अर्जुन एकमेकांना भेटत असले तरी दोघांपैकी कुणालाच त्यांच्या नात्याविषयी माहिती नाही. सात वर्षांपूर्वी अर्जुनने अप्पीला न भेटण्याचे व त्याच्याविषयी अमोलला माहीत न पडू देण्याचे वचन दिले होते आणि तेच वचन अप्पी आता पाळत आहे. अशातच आता या दोघांच्या आयुष्यात तिसरी व्यक्ती येऊ पाहत आहे. अर्जुनबरोबर असणारी त्याची मैत्रीण आर्या ही अर्जुनच्या प्रेमात पडली असून तिने अर्जुनविषयीच्या तिच्या भावना अर्जुनच्या बाबा व वहिनीकडे व्यक्त केल्या आहेत.
यासंबंधित मालिकेचा एक प्रोमो समोर आला असून यामुळे कथानकाला एक वेगळेच वळण येणार असल्याचे यावरून कळत आहे. या प्रोमोमध्ये आर्या अर्जुनच्या घरच्यांकडे तिच्या भावना व्यक्त करताना असं म्हणते की, “आज सगळीकडे ओरबडायची वृत्ती पाहायला मिळत आहे. माणसं प्रचंड हावरी झाली आहेत. पण अर्जुन तसा नाहीये. त्याची आणि माझी मैत्री कशी झाली? याचं उत्तर माझ्याकडे नाही. पण मी त्याच्या प्रेमात पडली आहे. मी ठरवलं होतं की, मी हे कधीच कोणाला बोलणार नाही. पण आज माझ्या तोंडून निघून गेलं.”
यापुढे अर्जुनची वहिनी आर्याला “तू हे आमच्यापासून का लपवणार होतीस?” असं विचारते. यावर आर्या असं म्हणते की, “आजही अर्जुन अपर्णा मॅडमवर प्रेम करतो.” त्यामुळे आता इतके दिवस अप्पी-अर्जुन यांची भेट होण्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती आणि अशातच आता आर्या म्हणून या दोघांमध्ये अडथळा आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता या दोघांचे नाते आणखी कठोर होणार? की यातून अप्पी-अर्जुन यांच्या नात्याला एक नवीन वळण येणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.