आजारपणात योग्य उपचार आणि योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला मिळाला की, शारीरिक समस्या दूर होतात. मात्र डॉक्टरांद्वारेच चुकीचा उपचार झाला तर होत्याचं नव्हतं व्हायलाही वेळ लागत नाही. असंच काहीसं मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीच्या बाबतीत घडलं आहे. अंशुमन विचारेची पत्नी पल्लवी विचारे हिने मृत्यू अगदी जवळून पाहिला आहे. आणि या सगळ्याला कारणीभूत चक्क एक डॉक्टरच आहे. युट्युबद्वारे एक व्हिडीओ शेअर करत पल्लवीने याबाबत माहिती दिली. पल्लवी मासिक पाळी संदर्भातील समस्येसाठी ठाण्यातील एका आयुर्वेदीक डॉक्टरकडे गेली. मात्र त्या आयुर्वेदिक महिला डॉक्टरने तिच्यावर चुकीचे उपचार केले. (Anshuman vichare wife health issue)
पल्लवीला अनियमित मासिक पाळीची समस्या जाणवत होती. याचा परिणाम तिच्या शरीरावरही होत होता. शारीरिक दुखणं वाढलं. म्हणूनच तिने आयुर्वेदिक उपचार घेण्याचे ठरवलं. यासाठी पल्लवी ठाण्यातील डॉ. अरुणा चावरडोल यांच्याकडे गेली. डॉक्टरांनी पल्लवीला रक्त तपासणी करावी लागेल असं सांगितलं. तिथेच तिची रक्त तपासणी करण्यास डॉक्टरांनी सुरुवात केली. मात्र ही रक्त तपासणी काही भलतीच होती. डॉक्टरांनी पल्लवीच्या हाताला सुई लावली आणि रक्त काढून घेण्यासाठी लावलेला पाइप थेट कॅप्सुल ट्रेमध्ये सोडला. याविषयी पल्लवीने डॉक्टरांना विचारलं.
नक्की इतकं रक्त का घेत आहेत? हेही मला बघूदेत असंही पल्लवी म्हणाली. मात्र डॉक्टर आणि त्यांची असिस्टंटही म्हणाली की, २४ तासात रक्त पुन्हा तयार होतं तुम्ही टेन्शन घेऊ नका. असं म्हणत तब्बल पावशेर ट्रे भर रक्त डॉक्टरांनी काढलं. पल्लवीला उठून बसण्यास सांगितलं. हा प्रकार काहीतरी भलताच आहे हे पल्लवीच्या लक्षात आलं. ट्रेमध्ये असलेलं रक्त डॉक्टरांनी फक्त हलवून पाहिलं. तुम्हाला वात आहे का? म्हणून विचारलं. इतकंच बोलून तुम्ही बाहेर बसून घ्या असं पल्लवीला सांगण्यात आलं. पल्लवीला काहीतरी विचित्र वाटत असल्याने तिने पती अंशुमनला दवाखान्यात तातडीने बोलावून घेतलं. अंशुमनशी बोलून झाल्यानंतर अचानक पल्लवीला चक्कर आली. जेव्हा तिला थोडीफार शुद्ध आली तेव्हा डॉक्टर तिला उठवण्याचा प्रयत्न करत होती. जोरजोरात गालावर मारत होती. तोपर्यंत अंशुमनही तिथे पोहोचला होता. अंशुमननेही डॉक्टरांना नक्की काय झालं? विचारलं. तेव्हा ते म्हणाले की, काही नाही तुमची पत्नी रक्त काढत असताना घाबरली म्हणून हे सगळं झालं आहे.
आणखी वाचा – “हा पब्लिसिटी स्टंट…”, ‘हेरा फेरी ३’मध्ये परेश रावल यांच्या एंट्रीवर नेटकरी भडकले, म्हणाले, “दिशाभूल…”
पल्लवीला घरी आणण्यात आलं. पण तरीही ती तेवढी शुद्धीत नव्हती. घरी आणल्यानंतर ती लगेचच झोपली. थोडीफार काही वेळाने पल्लवीला जाग आली. ती उठून बाथरुममध्ये जाणार तेव्हा पुन्हा तिला चक्कर आली. तातडीने तिला स्त्रीरोगतज्ज्ञाकडे नेण्यात आलं. तिचे पल्स रेट डाऊन झाले होते. तातडीने रुग्णालयामध्ये भरती करण्यास दुसऱ्या डॉक्टरांनी सांगितलं. तपासणीमध्ये निदर्शनास आलं की, तिचं रक्त (हिमोग्लोबिन) फक्त ६ पॉइंटवर होतं. त्यामुळे तिला हा सगळा त्रास झाला. हिमोग्लोबिन जर ५ पॉइंटपर्यंत आलं तर हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. पल्लवी हे सगळं सांगताना रडली. कारण यामध्ये पल्लवी व अंशुमनची मुलगी घाबरली होती. रडत होती. आईची झालेली अवस्था तिला पाहवत नाही. मरण अगदी जवळून पाहिलं अशा भावना पल्लवीच्या होत्या. डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारांमुळे पल्लवीला नको तो त्रास सहन करावा लागला.





