‘या गोजिरवाण्या घरात’, ‘असंभव’, ‘अवघाची संसार’, ‘शुभंकरोती’ ‘मला सासू हवी’ अशा गाजलेल्या मालिकांमधून व ‘वास्तव’ या हिंदी तसेच ‘कुंकू लावते माहेरचं’, मातीच्या चुली ‘ही पोरगी कुणाची’, ‘चेकमेट’ बालगंधर्व व आयडीयाची कल्पना अशा अनेक चित्रपटांतून घराघरांत लोकप्रिय झालेला चेहरा म्हणजे आनंद अभ्यंकर. आपल्या अभिनयाने मराठी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारे दिवंगत अभिनेते आनंद अभ्यंकर यांना एका भीषण अपघातात आपला जीव गमवावा लागला.
२३ डिसेंबर २०१२ चा तो दिवस. ज्यादिवशी आनंद अभ्यंकर यांच्यासह अक्षय पेंडसे या अभिनेत्यावर काळाने घाला घातला. शूटिंगवरुन घरी परतत असताना आनंद अभ्यंकर व अक्षय पेंडसे या कलाकारांनी एका दुर्दैवी अपघातात आपला जीव गमावला. एका कार्यक्रमाचे चित्रीकरण संपवून ते पुण्याहून मुंबईकडे निघाले होते. यावेळी अक्षय पेंडसे व त्यांचा लहान मुलगा व पत्नी यांच्याबरोबर आनंद अभ्यंकर मुंबई-पुणे एक्सप्रेसवरून प्रवास करत होते.
![](https://marathi.itsmajja.com/wp-content/uploads/2024/06/image-26.png)
यावेळी एका भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने या कलाकारांच्या कारला जोरात धडक दिली. उर्से टोलनाक्याजवळ बऊर गावानजीक रात्री बारा वाजण्याच्या सुमारास आनंद अभ्यंकर यांच्या मारुती व्हॅगनार गाडीला भरधाव टेम्पोने धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसें यांची पत्नी दिप्ती आणि मुलगा गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने निगडी येथील जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच अक्षय पेंडसे व त्यांचा दोन वर्षांचा मुलगा प्रत्युषचा मृत्यू झाला.
![](https://marathi.itsmajja.com/wp-content/uploads/2024/06/image-25.png)
आणखी वाचा – अक्षरा आजीकडून शिकत आहे कोल्हापूरी भाषा, अधिपतीला प्रपोज करत देणार सरप्राइज, नव्या नात्याला लवकरच सुरुवात
दरम्यान, या दुर्घटनेमुळे मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतील दोन महत्वाचे कलाकार काळच्या पडद्याआड गेले. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीत शोककळा पसरली होती. अनेक मराठी कलाकारांनी आनंद अभ्यंकर व अक्षय पेंडसेंच्या या अकाली निधनावर दु:ख व्यक्त केले होते. हे कलाकार आता हयात नसले तरी मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार व त्यांच्या अनेक चाहत्यांच्या कायम स्मरणात आहेत.