अजय देवगण व रोहित शेट्टी यांनी करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण ८’ च्या भागात हजेरी लावली होती. या शोमधील त्यांची मुलाखत सध्या सर्वत्र चर्चेत आली आहे. अजय देवगण याने त्याचे वडील दिवंगत आक्षण डायरेक्टर वीरू देवगण यांच्याबद्दल केलेलं भाष्य सध्या चर्चेत आलं आहे. या शोमध्ये बोलताना अजयने सांगितले की, “वडिलांनी वयाच्या १३व्या वर्षी घर सोडले आणि ते रस्त्यावर मारामारी करणाऱ्या गँगचे सदस्य बनले”. (Ajay Devgn On Father)
‘कॉफी विथ करण ८’मध्ये करणने अजयला विचारले की, “तुझ्या वडिलांचे योग्य कौतुक झाले आहे का?” यावर अजय म्हणाला, “हो. माझे वडील १३ वर्षांचे असताना पंजाबमधील घरातून पळून गेले होते. रेल्वेचे तिकीट न घेता त्यांनी मुंबई गाठली होती. त्यासाठी त्यांना ताब्यातही घेण्यात आलं होतं. त्यांच्याकडे काम नव्हतं आणि खायला अन्नही नव्हतं. पण कोणीतरी त्यांना मदत केली आणि सांगितलं की जर त्यांनी गाडी धुवून दिली तर ते त्या कारमध्ये झोपू शकतात. तिथून त्यांचा खरा प्रवास सुरू झाला. यानंतर वीरू सुतार बनले आणि त्यानंतर ते गुंड बनले. एका टोळीचा ते भाग होते. ते त्या टोळीकडून लोकांशी भांडायचे”.
जेव्हा अजयने शोमध्ये हे सर्व सांगितले तेव्हा करणने अतिशय धक्कादायक प्रतिक्रिया दिली. अजय पुढे म्हणाला,”एक दिवस सिनियर ऍक्शन डायरेक्टर रवी खन्ना यांनी त्यांना स्ट्रीट फाईट करताना पाहिले. त्याने गाडी थांबवली आणि वडिलांना विचारले, तुम्ही काय करता? पप्पा म्हणाले, ‘मी सुतार आहे’. खन्ना म्हणाले की, “तू खूप चांगला भांडतोस, उद्या मला भेटायला ये”. अशा प्रकारे माझे वडील त्यांचे सहाय्यक बनले आणि त्या नंतर बॉलिवूडचे प्रसिद्ध ऍक्शन डायरेक्टर म्हणून प्रसिद्ध झाले.
या एपिसोडमध्ये अजयसह उपस्थित असलेला दिग्दर्शक रोहित शेट्टी म्हणाला की, त्याच्या वडिलांची गोष्टही जवळपास सारखीच आहे. रोहितने सांगितले की, “त्याचे वडीलही वयाच्या १३ व्या वर्षी मुंबईत आले आणि येथे आल्यानंतर त्यांनी रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. नंतर त्यांनी बॉडी बिल्डिंगचे धडे घेतले. त्यांची उंची पाहून एका वरिष्ठ ऍक्शन डायरेक्टरने त्याला कामावर घेतले. रोहितचे वडील दिवंगत एमबी शेट्टी हे देखील ऍक्शन डायरेक्टर म्हणून लोकप्रिय होते.