झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या लोकप्रिय मालिकेतून खलनायिकेच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेल्या अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. ऐश्वर्या नारकर या सोशल मीडियावर विशेष सक्रिय असतात. मालिकेतील विविध कलाकारांसह पती अविनाश नारकर यांच्याबरोबरचे काही खास व्हिडीओ तसेच त्यांचे स्वत:चे फोटो व विविध रील्स त्या शेअर करत असतात आणि त्यांच्या या फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडून चांगला प्रतिसादही मिळतो.
सोशल मीडियावर त्या त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. ऐश्वर्या नारकर यांना सोशल मीडियावर जितके प्रेम मिळते, तितकेच त्या ट्रोलही होतात. मात्र त्या ट्रोलर्सचा अगदी योग्य समाचार घेतात. अशातच त्यांनी नुकतंच इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी त्यांच्या चाहत्यांनी त्यांना मालिकेव्यतिरक्त खाजगी प्रश्नही विचारले आणि आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांना ऐश्वर्या यांनी अगदी दिलखुलासपणे उत्तरे दिली

एका चाहत्याने ऐश्वर्या यांना “तुम्ही वैश्यवाणी आहात ना? व तुमचं गांव कोणतं?” असा प्रश्न विचारला आहे. चाहत्याच्या या प्रश्नावर ऐश्वर्या यांनी उत्र देत त्यांच्या गावाचे नाव ‘भुईबावडा’ असल्याचे सांगितले आहे. तसेच एका चाहत्याने ऐश्वर्या यांना खाजगी प्रश्नही विचारला आहे. “लग्नानंतर तुम्हाला कुणी प्रपोज केलं आहे का? ज्यांना तुमचे लग्न झाले आहे हे माहीत नाही?”. यावर ऐश्वर्या यांनी हसत “सगळ्यांना माझं लग्न झालं हे माहिती आहे” असं उत्तर दिलं आहे.
दरम्यान, अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी नेहमीच त्यांच्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. इतकंच नव्हे तर त्यांच्या सौंदर्याचेही अनेक चाहते आहेत. ऐश्वर्या यांनी त्यांच्या सौंदर्याने कायमच आपल्या प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. सध्या त्या झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची मराठी मुलगी’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. या मालिकेत त्या विरोचकाची भूमिका साकारत आहेत.