मराठी मनोरंजन विश्वातील क्युट कपलपैकी एक कपल म्हणजे अभिनेत्री सुचित्रा बांदेकर व अभिनेते आदेश बांदेकर. लोकप्रिय जोडींच्या यादीत या जोडीचं नाव आवर्जून घेतलं जातं. गेली ३३ वर्षे या जोडीचा सुखाचा संसार सुरु असलेला पाहायला मिळत आहे. एकत्र कुटुंबरोबरचे अनेक फोटो ते शेअर करत असतात. शूटिंगच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढत ते कुटुंबाला, एकमेकांना वेळही देताना दिसतात. आदेश बांदेकर यांना तर ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमामुळे लोकप्रियता मिळाली आहे. नुकतीच सुचित्रा बांदेकर यांनी सुलेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी सुचित्रा यांनी आदेश यांच्या स्वभावाबाबत बरंच भाष्य केलं. (Suchitra Bandekar On Aadesh Bandekar)
आदेश यांच्या स्वभावाबाबत बोलताना त्या म्हणाल्या, “आम्ही दोघांनी पळून जाऊन लग्न केलं. पुढचा-मागचा कसलाही विचार न करता लग्न केलं. त्याच्यामुळे सर्व जबाबदारी अंगावर आली आणि गरजेपोटी मी काम करायला सुरुवात केली. आदेशच्या घरुनही मला पाठिंबा होता. माझे बाबा आता या जगात नाहीत. त्यांना अल्झायमर हा आजार झाला होता. पण कोणाला खरं वाटणार नाही तर शेवट्पर्यंत त्यांना फक्त आदेशचं नाव लक्षात होतं. तेव्हा ते मला नेहमी म्हणायचे की, मी शोधूनही तुला इतका चांगला नवरा भेटला नसता. आदेश खरा आहे. धमाल आहे. राम आहे. तो प्रत्येक प्रसंगाला समोर जाऊ शकतो. आणि त्यातून तो मार्ग काढू शकतो ही त्याची कला आहे”.
पुढे त्या म्हणाल्या, “आदेशबरोबर जाऊन लोक बोलू शकतात, जे माझ्याबरोबर शक्यतो घडत नाही. आणि हेच त्याच्या ‘होम मिनिस्टर’चं गणित आहे. एक सामान्य गृहिणी जेव्हा त्याच्याबरोबर तिच्या मनातील बोलू शकते ही खूप मोठी गोष्ट आहे. समोरच्याचा मनात काय सुरु आहे, त्याला न दुखावता त्याच्या मनाला सांभाळून तो सर्व परिस्थिती हाताळतो. यासाठी त्याला कोणत्याही ओळखीची गरज नाही. मदत करणे हे त्याच्या डीएनएमध्ये आहे. गरज असताना आदेश बांदेकर पुढे असणार ही त्याची कला आहे. आणि म्हणून मला वाटत की, देवही त्याला नेहमी साथ देतो. तो ज्या गोष्टी करतो त्या सफल होतात कारण त्यामागचा त्याचा हेतू चांगला असतो”.
यापुढे त्या म्हणाल्या, “शुटिंगनिमित्त प्रवास करुनही त्याची एनर्जी अफलातून आहे. इतका प्रवास करुन घरी आल्यावर स्वामींच्या कृपेने तो माणूस नेहमीच फ्रेश असतो. माझ्या मनात काय सुरु आहे वा सोहमच्या मनात काय सुरु आहे हे तो कुठेही बसून सांगू शकतो. त्याला एका हॅलोमध्ये सर्वकाही कळतं. आमच्या लग्नाला 33 वर्ष झाली आहेत तरीही तो अजूनही माझं तेवढंच मन जपतो”.