Vijay Kadam Died : ८० ते ९०च्या दशकात मराठी रंगभूमीवर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे. विजय कदम यांचे आज राहत्या घरी निधन झाले असल्याचं समोर आलं. अंधेरी येथील निवासस्थानी वयाच्या ६७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी पदमश्री आणि मुलगा गंधार असा परिवार आहे. विजय हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. अभिनेते गेले काही दिवस कर्करोगाशी झुंज देत होते. मात्र अखेरीस त्यांची ही झुंज अपयशी ठरली.
विजय कदम गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देत होते आणि त्यांनी त्यावर मात केली होती, मात्र त्यांचा कॅन्सर पुन्हा बळावला, त्यामुळे त्यांना पुन्हा मुंबईतील अंधेरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कर्करोगावरील उपचार म्हणून दोनदा सर्जरी व केमोथेरपी त्यांनी घेतली. विजय कदम यांच्या निधनाच्या बातमीनंतर संपूर्ण कलासृष्टीतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मराठी सिनेसृष्टीने एक हरहुन्नरी कलाकार गमावला असल्याची भावना सिनेसृष्टीच्या कलाकारांनी व्यक्त केली आहे. आज ओशिवरा अंधेरी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.
विजय कदम यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींनी गर्दी केली होती. विजय पाटकर,अजिंक्य देव, जयवंत वाडकर, विकास कदम, राजू पार्सेकर, नागेश भोसले, पितांबर काळे, पल्लवी जोशी, स्वप्नील बांदोडकर, अनिल सुतार, वसंतराव जोशी, चेतन दळवी, अभिनय देव, सविता मालपेकर, सुनील बर्वे, भारत गणेशपुरे, विजय केंकरे, मंगल केंकरे, डाॅ. संजय भिडे, पुरुषोत्तम बेर्डे ,अनिल कालेलकर, विवेक अन्निहोत्री, विजय गोखले , विनय येडेकर, नंदू माधव, विवेक आपटे इत्यादींनी ओशिवरातील स्मशानभूमीत विजय कदम यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
विजय कदम यांनी रंगभूमीबरोबरच मराठी चित्रपटात देखील काम केलं होतं. ‘विच्छा माझी पुरी करा’ हे त्यांचं गाजलेलं लोकनाट्य. तर त्यांचा ‘खुमखुमी’ हा कार्यक्रमही मोठ्या प्रमाणावर गाजला होता. ‘रथचक्र’, ‘टुरटूर’ यांसारख्या नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. १९८०च्या दशकात छोट्या-मोठ्या विनोदी भूमिका साकारुन त्यांनी आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली.