suyash tilak car accident : मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता सुयश टिळकबाबत मोठी बातमी समोर आली आहे. का रे दुरावा या मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेल्या सुयशच्या अपघाताची बातमी समोर आली. ही धक्कादायक बातमी समोर येताच अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली. पण या अपघातात सुयश सुखरूप असल्याचं समजलं आणि चाहत्यांच्या जीवात जीव आला. सुयशने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ही दुर्घटना घडली असल्याचं सांगितलं. सुयश सोशल मीडियावर सक्रीय असतो. सुयशने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्याच्या कारचा अपघात झालेला दिसत असून सुयशने अपघाताबद्दल सांगितलं आहे.
सुयशच्या अपघातानंतर सहा ते सात तास टोईंग ट्रकमध्ये बसून मुंबईला आला असल्याचं दिसत आहे. याबद्दल सांगताना सुयशने लिहिलं की, “वाहन न चालवता केलेला सर्वात लांबचा प्रवास, थोडासा अपघात झाला, पण सुदैवाने कुठलीही दुखापत झाली नाही. मात्र, झालेल्या नुकसानामुळे माझी गाडी अक्षरशः बंद पडली. मला किंवा इतर कुणालाही दुखापत झाली नाही, याबद्दल मी कृतज्ञ आहे. पण ही घटना अशा ठिकाणी घडली जिथे मला कोणतीही मदत मिळत नव्हती. घरी जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे गाडी टो करुन थेट मुंबईत आणणं. साधारण तासभर प्रतीक्षा केल्यानंतर मदत पोहोचली”.
पुढे सुयश म्हणाला, “टो ड्रायव्हर म्हणाला, तुम्ही आत बसा, गाडीला कधी मदतीची गरज भासली तर? मदत काय? गाडी तर श्वासही घेऊ शकत नव्हती, मग मी बसलो होतो एका शांत एसी नसलेल्या माझ्या गाडीत. सहा-सात तास महामार्गावरुन ओढत नेलं जाणार होतं. रस्त्यावरचे लोक आत डोकावत, काही जण माझ्या अवस्थेवर हसत होते, तर काही कदाचित काय झालं असेल याचा अंदाज बांधत होते. मी रागावू शकलो असतो, चिडलो असतो, वैतागलो असतो. पण कधी-कधी आयुष्य तुमच्यासमोर जी परिस्थिती आणते, ती तशीच स्वीकारावी लागते”.
शेवटी सुयश म्हणाला, “मी पुस्तक वाचलं, संगीत ऐकलं, थोडा झोपलो. या असामान्य हलत्या सीटवरुन जग सरकताना पाहिलं. दिवसभराचा अनुभव मोबाईलमध्ये टिपला आणि तो एडिट करुन मिनी व्लॉग बनवला. तुम्ही या व्लॉगचा आनंद घ्या. कधी कधी, आयुष्य तुम्हाला खेचत नेतं, तुम्हाला आवडो वा न आवडो. तुम्ही तो प्रवास रागाने घालवू शकता किंवा खिडकी उघडून, खोल श्वास घेऊन, तो प्रवास एन्जॉय करु शकता”.





