Milind Gawali On Atul Parchure : बरेचदा कलाकार मंडळी इतर आपल्या सहकलाकाराबाबत मन मोकळं करताना दिसतात. अशातच एक मराठमोळ्या अभिनेत्याने जगाचा निरोप घेतलेल्या लोकप्रिय अभिनेत्याच्या आठवणीत केलेली पोस्ट साऱ्यांचं लक्ष वेधत आहे. अभिनेते मिलिंद गवळी यांनी दिवंगत अभिनेते अतुल परचुरे यांच्या आठवणीत केलेली पोस्ट साऱ्यांचं लक्ष वेधत आहे. अभिनयाबरोबरच मिलिंद गवळी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच ते काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतात. अशातच आता त्यांनी अतुल परचुरे यांच्या बरोबरचा मुलाखतीचा व्हिडीओ शेअर करत मिलिंद यांनी शेअर केलेली पोस्ट साऱ्यांचं लक्ष वेधणारी आहे.
मिलिंद यांनी अतुलबरोबरचा व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं की, “कालाय तस्मै नमः अतुल परचुरे यांनी “जोडी नंबर वन” या झी टीव्हीच्या कार्यक्रमासाठी घेतलेला आमच्या मुलाखतीचा व्हिडीओ कुणीतरी मला फॉरवर्ड केला. जवळजवळ पंचवीस वर्षांपूर्वीची ही मुलाखत होती. त्यावेळी चे अतुल बरोबरचे सगळे प्रसंग अगदी काल घडल्याप्रमाणे डोळ्यासमोरुन गेले. अतुलला मी कधीही ‘अतुल’ अशी हाक मारली नाही नेहमी त्याला ‘अतुलनीय’ म्हणायचो, आणि तो होताच तसा अतुलनीय. Incomparable. १४ ऑक्टोबर २०२४ ला अतुल आपल्याला सोडून निघून गेला. अतुल आपल्यात नाही हे अजूनही खरं वाटत नाही. काल-परवापर्यंत आपल्याशी छान गप्पा मारणारा, आपल्याला हसवणारा, आपलं भरभरुन कौतुक करणारा आपला छानसा मित्र, अचानक कायमचा हे जग सोडून निघून जातो, परत कधीही आपण त्याच्याशी बोलू शकणार नाही, परत कधीही आपण त्याला बघू शकणार नाही, आता आपण कधीच त्याच्याबरोबर काम करु शकणार नाही, एकदा मनुष्य निघून गेला की सगळं तिथेच थांबतं, there is a void , complete emptiness. अशी जवळची आणि छान माणसं जेव्हा निघून जातात तेव्हा त्यांची जागा कोणीच भरुन काढू शकत नाही”.
पुढे ते म्हणाले, “आपण पण ना असं जगत असतो की आपण आहोत, कायमचे राहणार आहोत, आपल्याकडे खूप वेळ आहे, पण नाही, खरंतर आपण पण पुढे सरकत आहोत, आज आहोत उद्या नसणार आहोत आणि जग काही तुमच्या आमच्या वाचून थांबणार नाही, त्यामुळे जे काही करायचं आहे ते आपल्याला आता, आपले एखाद्या प्रिय व्यक्तीला भेटायचं राहून गेला असेल, त्याच्याशी बोलायचं राहिल असेल, तर उद्यावर ढकलू नका, योग्य वेळ आहे आता, आज, अभी”.
आणखी वाचा – ‘बिग बॉस’च्या घरात राशनचा तुडवडा; रोशन भजनकर-ओमकार राऊत भिडले, ‘बिग बॉस’ देणार पूर्ण घराला शिक्षा?
शेवटी त्यांनी लिहिलं, “अतुल बरोबर पुन्हा काम करायची इच्छा, एकत्र भेटून छान गप्पा मारायची इच्छा, सगळं सगळं राहूनच गेलं. जे आता या जन्मात शक्य नाही. फक्त त्याच्याबरोबरच्या छान आठवणी त्या मात्र कायमस्वरुपी माझ्याजवळ मी असेपर्यंत राहणार आहे. “कालाय तस्मे नमः” त्या काळाला आणि वेळेला वंदन / नमस्कार “. त्यांच्या या पोस्टवर लाईक्सचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे.





