‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या लोकप्रिय मालिकेमधून घराघरांत पोहोचलेला अभिनेता म्हणजे अभिजीत खांडकेकर. या मालिकेतील त्याच्या भूमिकेने त्याने महाराष्ट्रातील प्रत्येक प्रेक्षकाला वेड लावले. आपल्या निरागस हास्याने व लुकमुळे अभिजीत अनेक तरुणींच्या गळ्यातला ताईत बनला. आजही या मालिकेची व या मालिकेतील त्याच्या भूमिकेची क्रेझ काही कमी झालेली नाही. या मालिकेने अब्भिजीतला लोकप्रियता व प्रसिद्धी तर दिलीच पण त्याचबरोबर त्याच्या वाटेला काही वाईट अनुभव काही वाईट प्रसंगही आले.
‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेत काम करत असताना अभिजीतला काही वाईट अनुभव प्रसंगांना सामोरे जावे लागले होते. याबद्दल स्वत: अभिनेत्याने आता भाष्य केले आहे. अभिजीतने नुकतीच भार्गवी चिरमुलेच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला त्याच्या बालाजी फिल्म्स या प्रॉडक्शन हाऊसच्या अनुभवाबद्दल विचारण्यात आले. पहिल्या मालिकेदरम्यान त्याला कशी वागणूक मिळाली, याबद्दल त्याने आपलं मत स्पष्टपणे व्यक्त केलं आहे.
अभिजीतचा बालाजी फिल्म्सचा अनुभव कसा होता? असं विचारलं असता अभिजीत म्हणाला, “मी खरंतर याबद्दल बोलणं टाळतो. मी अगदी थेट बोलतो असं करण्यामध्ये वगैरे मला अजिबात रस नाही. खरं तर ही माझी पहिलीच मालिका आणि मी याबद्दल पूर्णपणे प्रॉडक्शन हाऊसला दोष देणार नाही. पण यात अनेक लोकांचा सहभाग असतो. ती माझी पाहिलीच मालिका होती, पण आता मागे वळून बघताना असं वाटतं की नाही तेव्हा काही बाबतींमध्ये फारच वाईट वागवण्यात आलं. संधी दिली असं म्हणत खूपच कमी पैशांमध्ये तेव्हा आमच्याकडून काम करून घेण्यात आलं होतं. पण तेसुद्धा ठिकच आहे आणि तो एक व्यवसायाचा भाग आहे. त्यामुळे त्याबद्दल आता रडून काही उपयोग नाही.”
आणखी वाचा – बॉक्स ऑफिसवर हिट झालेला ‘शैतान’ आता ओटीटीवर यायला सज्ज, कधी व कुठे पाहता येणार हा चित्रपट? जाणून घ्या…
यापुढे त्याने असं म्हटलं की, “त्या मालिकेने आम्हाला इतकी प्रसिद्धी मिळवून दिली. पण तरीसुद्धा अगदी लहान-सहान गोष्टींपासून जेव्हा तुम्हाला त्रास होतो तेव्हा असं वाटत की एक माणूस म्हणून चांगली वागणूक दिली पाहिजे. या क्षेत्राच्या नियमांनुसार जे काही आहे, त्यात चांगल्या पद्धतीचं जेवण आलं, चांगल्या पद्धतीची वागणूक आली, तर या अनेक गोष्टी झाल्या नाहीत. मला माहीत नाही कसं, पण माझ्यामध्ये ते धैर्य कुठून आलं मला माहीत नाही, पण त्यावेळेस मी त्या विरोधात आवाज उठवला होता.”
तसेच त्याने यापुढे “मी त्या त्या वेळेस त्यांना सुनावलं होतं. कारण आधी मला कॉर्पोरेटचा अनुभव असल्यामुळे मला माहीत होतं की, हे चुकीचं आहे. तुम्ही संधी देत आहात, तुम्ही आमच्याकडून मोठं काम करुन घेत आहात. जेणेकरुन आमचं करिअर घडेल, हे सगळं मान्य आहे. पण याचा अर्थ असा नाही की, आम्ही कुणाचे गुलाम आहोत” असंही म्हटलं आहे..